Thursday 28 March 2013

'सतलज' च्या काठावर...(भाग-२)


रात्री त्या guest house वर भयाण वाटू लागले. थंडी भयानक होती. इतर रूम्स मध्ये कुणीच नसल्याने आम्ही तिथली पांघरुण, रजई, एकत्र केली. प्रत्येकाने अंगावर ३-४ रजई घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्य म्हणजे आमच्या रूम ला कडी नव्हती. ज्या खोल्यांमध्ये कडी-कोयंडे होते तिथली वीज गायब होती. सगळा गोंधळ होता. रात्री नोकराने कहर केला. २-३ च्या दरम्यान battery चा एक मोठा झोत चेहऱ्यावर पडला. बघतो तर समोर नोकर. !! सगळं काही ठीक चाललंय का; असे विचारयला तो आला होता. त्याने उगाच झोपमोड केली होती. पैसे वगैरे चोरायला हा आलाय की काय अशी शंका सुद्धा आमच्या मनात येऊन गेली. पहाटे ५ वाजता आम्हाला पाण्याचा आवाज ऐकू आला. पुन्हा झोपमोड झाली. खोलीच्या बाल्कनी मधून खाली पाहिले तर नोकर अंगणातल्या नळाखाली बसून थंड पाण्याने अंघोळ करीत होता. बाहेरच्या दाट धुक्यात आणि कमालीच्या थंडीत ह्याचे अघोरी प्रताप चालू होते. !! हा नोकर खरंच माणूस आहे की अजून कुणी आहे हे तपासणे आता गरजेचे वाटत होते.

सकाळी ९ वाजता जाग आली. ११ पर्यंत कंपनीत रिपोर्टिंग करायचे होते. Guest house पासून bus stand पर्यंत उलट जाऊन कुठलीही बस पकडून Ranbaxy ला जाता येते. बसने जवळपास २० मिनिटे लागायची. एकेक दिवस असा मागे सरत होता. काम वाढले होते. नव्या ठिकाणी रुळायला हळूहळू सुरुवात झाली होती. दुपारचे जेवण तिकडेच होत असल्याकारणाने तो एक प्रश्न मिटला होता. रात्रीच्या जेवणाचा धाबाही ठरलेला असे. Project च्या कामात दिवस कसे जात ते कळत नसे. रोज रात्री परतल्यावर मात्र वेगळीच भीती वाटायची. ते guest house खायला उठायचे. नोकराचे काहीतरी उपद्व्याप सुरूच असायचे. मालकाचे आम्हाला अजून पर्यंत दर्शन झाले नव्हते. 

त्यात माझ्या एका colleague ने निराळाच डाव रचला. पळून जायची नामी युक्ती शोधून काढली होती. नोकराचे पाय त्याने एकदा उलटे बघितले आहेत अशी भीतीयुक्त अफवा आमच्यात पसरवायला सुरुवात केली. या वक्तव्याला अनुसरून तो acting करू लागला. कंपनीतल्या काही लोकांना तो ही कथा मुद्दाम सांगत असे. त्याला इथे राहायचे नाही आहे हे मला समजून आले होते. त्याला वेड्यात काढणे म्हणजे आपलाच वेळ घालवणे होते. अपेक्षेप्रमाणे आजोबा वारल्याचे कारण सांगून तो तिथून चालला गेला. त्याने फोनवरून manager ला तसे कळवले होते. तो एकूणच नोकराला आणि त्या ‘हवेली’ला भिला होता हे सत्य होते. उरलेल्या आम्ही दोघांनी त्याचा विचार न करता routine चालू ठेवले.

दोन आठवडे उलटून गेले होते. एक दिवस मित्राला थोडे बरे वाटत नव्हते. तो guest house वरच थांबला होता. त्यादिवशी मी संध्याकाळी उशिरा परतलो. तो अंथरुणावर पडून होता. त्याच्या पोटात खूप दुखत होते. तो आजारी आहे म्हणून नोकराने चहा आणून दिला होता. त्या चहात तर काही टाकले नव्हते ना अशी शंका आम्हा दोघांनाही आली पण ते सध्या महत्वाचं नव्हतं. त्या एकाट जागेत डॉक्टर मिळणे अवघड होते. मी मोबाईल वरून पुण्यातल्या आमच्या family doctor ला फोन लावला. त्याला सर्व details सांगितले आणि medicines लिहून घेतले. नशीब बलवत्तर होते. Bus stand पासून medical १० मिनिट अंतरावर होते.

निर्जन रस्त्यावर, धुक्याने वेढलेल्या त्या सतलज काठच्या परिसरात रात्री-अपरात्री फिरणे म्हणजे धैर्याची परीक्षा होती. ‘रात्री medical उघडे असेल का?’ हा विचार करता करता तिथे पोहोचलो. ते उघडे असल्याचे पाहून जीव भांड्यात पडला. औषधे मिळाली. Medical मधल्या chemist ने सांगितले की या भागात संध्याकाळी ७ नंतर सगळं सुनसान होतं. एवढे Medical चालू असते. रोज रात्री १० वाजता एक पोलीस मित्र कामावरून येताना त्या chemist ला घरी जाई पर्यंत सोबत करत असे. मी गप्पागोष्टींमध्ये अधिक वेळ न घालवता guest house वर परतलो.

त्या मधल्या वेळात नोकराने मित्रासाठी औषध म्हणून कुठल्यातरी जडीबुटींचा काढा आणून दिला होता. आमचा नोकरावरील संशय दिवसागणिक वाढत होता त्यामुळे मित्राने हुशारीने तो काढा मोरीत ओतला. मित्राला औषधं दिली. परीणामस्वरूप, सकाळी त्याला व्यवस्थित बरे वाटू लागले. 

(क्रमशः)



Monday 25 March 2013

'सतलज' च्या काठावर...(भाग-१)



७ जानेवारी २००६. अंबाला स्टेशनला पहाटे उतरलो... कडाक्याची थंडी जाणवत होती. २ डिग्री तापमान. !! स्वेटर, कानटोपी, मफलर प्रभावहीन झाले होते. सोबतीला ऑफिसचे आणखी दोन जण होते. त्यातला एक मित्र होतातिथून आम्हाला पंजाब मधल्या रोपड या ठिकाणी जायचे होते. रोपडला Ranbaxy मध्ये तीन आठवड्यांचा project मार्गी लावायचा होता. नवी नोकरी असल्याने जाणं भाग होतं. तसेही नवीन जागा, नवी माणसं, नवा अनुभव याबद्दल उत्सुकता होती. चंडीगढला जाणाऱ्या बस सकाळी ६ वाजल्यानंतर असल्यामुळे तोपर्यंत स्टेशनवरच थांबणे भाग होते. नेमका पाऊसही सुरु झाला होता. रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये शिरलो. आत कुणीच नव्हतं. वाटलं इथे थोडी थंडी कमी जाणवेल. पण कसलं काय !! थंडी आणि पाऊस दोघांनीही युती केली होती आणि थैमान मांडले होते.

एकदाचे ६ वाजले. पाऊस बऱ्यापैकी ओसरला होता. चहाच्या टपरीवर चार-दोन माणसे उभी दिसली. चहा उकळत होता. स्टेशन बाहेर सहा-सात बस उभ्या होत्या. चौकशी करून चंडीगढ चे तिकीट काढले. चहा घेतल्यावर बसमध्ये जाऊन बसलो. बाहेर अजूनही अंधार होता. अंबाला ते चंडीगढ आणि तिथून बस बदलून रोपड; असा प्रवास होता. चंडीगढला पोहचेपर्यंत उजाडलं होतं. सिमेंटचे स्वच्छ रस्ते, मोठे चौक, नीटनेटकेपणा आणि sectors ही त्या शहराची खासियत आहे. Planned शहर कसे असावे याचे ते कदाचित उत्तम उदाहरण असेल. तिथे उतरल्यावर breakfast करून आम्ही पुन्हा bus stand वर आलो आणि रोपड ला जाणाऱ्या बस मध्ये बसलो. काही वेळात शहरी भाग मागे पडला. हिरव्यागार शेतांनी बहरलेला पंजाब आता दृष्टीस येत होता. ओसाड जमीन कुठे दिसलीच नाही. पाण्याची मुबलकता दिसून येत होती. यशराज च्या सिनेमांत दाखवल्याप्रमाणे लांबच लांब ‘सरसों कें खेत’ आणि कुरणं पसरली होती. त्या शेतांत मधेच दोन-तीन दुमजली घरं दिसायची. धुकं अजून विरळ झालं नव्हतं. पाऊस पुन्हा सुरु झाला होता.

रोपड च्या bust stand ला पोहचायला १० वाजले. हा bus stand अगदी वेशीवर आहे. त्यापुढे गेल्यावर विस्तीर्ण सतलज नदीचे पात्र विखुरलेले दिसते. नदीवरचा पूल अरुंद व बराच लांब आहे. बस मधून उतरल्यावर आम्ही guest house कुठे आहे त्याची चौकशी केली. कंपनीने guest house चा पत्ता वगैरे सांगितला होता. त्याठिकाणी booking करायची गरज नसते हेही सांगितले होते. एक रूम आपल्या कंपनीकरीता नेहमीच राखीव ठेवतात अशी माहिती दिली होती; तरीही आम्ही तिघे “जागा मिळेल का?” या चिंतेत होतो. !! सायकल-रिक्षा करून guest house वर पोहचलो. आश्चर्य म्हणजे stand वर एकमेव सायकल-रिक्षा उभा होता. थंडीत कुणी घराबाहेर जात नसावे असा आम्ही अंदाज बांधला. Bus stand कडून सतलज नदीकडे जाताना हे guest house लागत होते. सतलजच्या काठावर ते विसावले आहे असे म्हटले तरी हरकत नाही. अंतर पायी कापता येण्यासारखे होते परंतु प्रवासाचा क्षीण बोलू लागला होता. त्यावर मात करणे अशक्य होते. 

ते guest house म्हणजे एक प्रकारचा भूत-बंगला वाटत होता. Horror TV serial किंवा film च्या shooting साठी तर तो perfect set होता. एकाट बंगला... धुकं... पावसाच्या हलक्या सरी... निर्मनुष्य रस्ता... फक्त कमतरता होती ती अमावस्येच्या रात्रीची. !!

बेल वाजवली. रामसेच्या सिनेमात दरवाज्याचा जसा आवाज येतो तसा आवाज ऐकू आला. नोकराने दार उघडले. माणूस विचित्र वाटत होता. आम्ही त्याला कुठून आलो, कशासाठी आलो वगैरे माहिती सांगितली. आत गेल्यावर त्याने रूम मधून रजिस्टर आणले आणि सगळे टिपून घेतले. त्याने मागितल्या प्रमाणे आम्ही दहा दिवसांचे  advance payment करून टाकले. तिथे फक्त राहायची सोय होती. त्यानंतर त्याने आमची रूम दाखवली. गरम पाणी करण्यासाठी boiler कसे वापरावे इत्यादी सूचना तो देऊ लागला. Bus stand च्या अलीकडे जेवणाची उत्तम सोय होईल असेही त्याने सांगितले. आम्हाला तो बंगला नसून मोठी हवेली वाटत होती. ‘इथे आणखी कुणीच दिसत नाही आहे’ हे विचारल्यावर त्या नोकराने off season चे कारण पुढे केले. तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन देऊन तो नोकर निघून गेला. आमचे मात्र त्याच्या बोलण्यावर समाधान झाले नाही. एकंदरीत मामला ‘गडबड’ वाटत होता...

दुपारी जेवणासाठी hotels ची शोधाशोध सुरु झाली. Bus stand च्या आसपास hotels आणि धाबे होते. एका धाब्यावर गरमागरम आलूपराठे आणि लोणी यांवर भरपूर ताव मारून आम्ही guest house ला परतलो. काहीवेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी ६ च्या दरम्यान जाग आली. बाहेर अंधार पडला होता. पुन्हा धुके दाटले होते. उशिरा जेवण झाल्याने रात्री कुणीच जेवणार नव्हते त्यामुळे जरा आजूबाजूला फिरून येऊ असे ठरवत आम्ही guest house बाहेर पडलो. नोकर खाली दारापाशी विडी ओढत बसला होता. त्याने अंधारात नदीपात्राकडे जाऊ नका असा सल्ला दिला. रस्त्यावरचे मिणमिणते लाईट्स, धुकं यामुळे गूढ वातावरण निर्माण झाले होते. क्वचित एखाद-दुसरे वाहन त्या रस्त्यावरून जाताना दिसत. 

(क्रमशः)

Tuesday 19 March 2013

‘मेरा सब सामान... ‘


नागपूरातील एकेकाळची ही बहुचर्चित घटना आहे. ‘अपार्टमेंट’ किंवा ‘सोसायटी’ हा concept त्यावेळी बऱ्यापैकी प्रचलित होण्याच्या मार्गावर होता. नागपूर शहर मुळातच प्रशस्त. अजूनही तिथे जागोजागी independent घरं, बंगले, बगीचे, मैदानं दिसतील. परंतु हे सगळं ‘जैसे थे’ थोडीच राहणार आहे. !! वाढणारी लोकसंख्या, स्थलांतर, जागेची कमतरता या बाबी कोणत्याही शहरात कधी ना कधी flat संस्कृतीला जन्म देतातच. अशाच नुकत्याच निर्माण झालेल्या Lay-Out मधील एका अपार्टमेंट मध्ये घडलेली ही एक मजेशीर घटना.

आमच्या एका नातलगांनी नव्या कोऱ्या flat मध्ये ‘गृहप्रवेश’ केला होता. घरात एकूण सदस्यसंख्या पाच. मोठ्या कष्टाने ‘घरघर’ संपून एकदाचे घर झाले होते. वास्तुपूजा एवढ्यात न करता जरा ‘चांगला’ मुहूर्त पाहून निवांतपणे महिन्याभरात करू असा एक मतप्रवाह घरात वाहू लागला. कुठलाही मुहूर्त ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चांगलाच असतो. कदाचित रामराज्याभिषेक याला अपवाद असेल पण ‘वाईट मुहूर्त’ हा शब्दप्रयोग माझ्यातरी ऐकीवात नाही. असो. तात्पर्य असे की ‘वास्तुशांती पुढे ढकलावी’ हा प्रस्ताव सरतेशेवटी एकमताने पारित करण्यात आला. घर ताब्यात घेतल्याच्या दोन-तीन दिवसांनंतर ‘शेजारी’ येऊन भेटून गेले. शेजाऱ्यांनी त्यांचा flat दोन वर्षांसाठी भाड्याने दिला आहे असे समजले. तेवढ्या वेळासाठी ते इथे राहणार नव्हते. त्यांची बदली भिलाई ला झाली होती. शेजाऱ्यांनी घराच्या किल्ल्या आमच्या नातेवाईकांना सुपूर्द केल्या आणि भाडेकरू आल्यास त्याला त्या देऊन टाकाव्यात असेही सांगितले. भाडेकरूची इत्यंभूत माहिती देखील दिली. भाडेकरू कुणीतरी ‘हरमीत सिंग भुट्टा’ नावाचा सरदारजी होता. Central Govt. चा employee होता. उच्च पदावर कार्यरत होता. घरचा श्रीमंत. पंजाबमध्ये कुठल्यातरी गावात मोठी शेतीवाडी होती. त्याची चंडीगढहून नागपूरात बदली झाली होती. एका मध्यस्था मार्फत ही deal पक्की झाली होती.

आठवड्याभरात सरदारजींचा फोन आला. परवा नागपूरला सामानासकट पोहचतो आहे असे त्यांनी आमच्या नातलगांना कळविले. फक्त काही formalities पूर्ण करायला ते यावेळी येणार होते. सामान dump करून सरदारजी पुन्हा ८ दिवसांकरीता चंडीगढला परतणार होते आणि पुढच्या खेपेस कुटुंबासहित येणार होते. अगदी सरळ सोपा plan होता.

सरदारजींच्या आगमनाचा दिवस उजाडला. आमच्या नातलगांमधल्या पुरुष वर्गाने मुद्दाम half day टाकला होता. ‘शेजारी’ दुसऱ्या राज्यातला असल्याने आमच्या नातलगांमध्ये ‘थोडी ख़ुशी थोडा गम’ असे वातावरण होते. तो आपल्याशी मिळून मिसळून वागेल का? की भांडकुदळ असले? सरदारजी चिडला तर आपल्याला काही धोका वगैरे असणार का? Govt. क्वार्टरर्स सोडून हा इथे का येतोअसे प्रश्न काही सदस्यांच्या डोक्यात गर्दी करू लागले तर काही सदस्य ‘सरदारजी लोक फार jolly असतात, खूप मदत करतात’ असे सांगून आणखी confusion वाढवत होते.

सकाळी ९-१० च्या दरम्यान दारावरची बेल वाजली. स्मित-हास्य करत सरदारजी दारात उभे होते. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. हातात gift paper ने गुंडाळलेली फळांची टोपली होती. आमच्या नातलगांसाठी एक भेट म्हणून त्यांनी ती आणली होती. इतकी फळं आमच्या नातेवाईकांनी केवळ दुकानात किंवा पूजेनिमित्तच पाहिली होती. ही भेट पाहून कुटुंबातल्या सदस्यांचा जीव भांड्यात पडला आणि ‘चांगला दिसतोय बिचारा माणूस...’ असे प्रत्येकाने मनात म्हटले. या gift ला प्रत्युत्तर म्हणून सरदारजींसाठी नाश्त्याचा प्रबंध करण्यात आला. यथावकाश गप्पा आणि नाश्ता आटोपल्यावर सरदारजींनी चावी घेतली. तासाभरात सामान वाहून आणणारा एक truck खाली पोहोचला होता. Truck मध्ये driver सकट आणखी तीन माणसं होती. सरदारजींनी सगळे सामान उतरवून घेतले. संपूर्ण सामान वर चढवायला पाच तास लागले. देखरेखीला office मधून एक मदतनीस सरदारजींनी बोलावला होता. त्याला सूचना देऊन सरदारजी office साठी रवाना झाले. तिथे फक्त त्यांना हजेरी लावायची होती. फारसं काम नव्हतंच. रात्री त्यांची flight होती. कार्यालयीन औपचारिकता संपवून ते लगेच निघणार होते.

इकडे पंजाबहून आलेले ते अतिभव्य सामान बघून आमच्या नातलगांना ‘मध्यमवर्गीयपणाची’ खूपच जाणीव होऊ लागली. नवीन घरात अमुक तमुक वस्तू आता घ्यायचीच असा महिला सदस्यांनी चंग बांधला आणि त्याबद्दल चर्चा सुरु केली. ह्यातले गांभीर्य लक्षात घेऊन व प्रसंगावधान राखून पुरुषवर्गाने half day संपत आलाय अशी घोषणा देत आपआपल्या office कडे कूच केले.

सुमारे पाच वाजेपर्यंत सरदारजी परतले होते. एव्हाना सामान चढवून झाले होते. सरदारजींनी आमच्या नातेवाईकांकडे चावी दिली आणि पुन्हा लवकर भेटूच असे म्हणत विमानतळाकडे प्रस्थान केले. Truck निघाला होता. घरातली पुरुष मंडळी सात-साडेसात पर्यंत घरी परतली. त्या दिवशी रात्री जेवताना किंवा त्यानंतर, कुठलीही विशेष चर्चा न करता सगळे सदस्य, दिवसभराच्या धावपळीमुळे शांत झोपी गेले.

दोन-तीन दिवसांत सरदारजींचा पुन्हा फोन खणखणला. त्यांनी बदली cancel केल्याची बातमी होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते असे ते म्हणाले. लहान भावाला पाठवून ते सामान परत बोलावणार होते. दिवसांची थोडी चुकामुक झाली होती.
सरदारजींना दुप्पट भुर्दंड पडणार होता पण बदली cancel झाल्याने कदाचित ते आनंदात वाटत होते. आमच्या नातलगांचा मात्र इकडे हिरमोड झाला. शेजारधर्माचीसगळी स्वप्नं भंग पावली होती. पुरुष वर्गाने त्यातल्या त्यात पैसे चारून बदली cancel केली असेल त्या सरदारजीनीअसा शेरा मारून विषय बंद करायचा प्रयास केला. महिला वर्ग खजील होता. शेजारचे घर रिकामे म्हणजे दुपारच्या security चा प्रश्न आलाच. नवा भाडेकरू मिळेपर्यंत तरी ही चिंता कायम राहणार होती. पुन्हा एक सरदारजी सामान घ्यायला येणार, पुन्हा त्याची खातिरदारी करायची हा एकूणच प्रकार सगळ्यांना कंटाळवाणा वाटत होता. येणाऱ्या पाहुण्याला चहावर भागवाअसे आदेश पुरुष वर्गाकडून आले. त्यादिवशी Half day ची सुटी न टाकता Full day Office असणार होते. साहजिक आहे, त्या त्या प्रसंगाचाही एक perspective असतो अजून काय !!

दुसरा सरदारजी येण्याचा दिवस उजाडला. ठरल्या वेळेच्या अर्ध्या-एक तासानंतर सरदारजी आले. पहिल्या सरदारजींचे धाकटे बंधू हरजीत सिंग भुट्टा अशी त्यांनी ओळख करून दिली. पुरुषवर्ग कामावर गेला होता. स्त्रीवर्गाने आदेशानुसार चहा-बिस्किटांवर पाहुणचार निपटवला. हरजीत सिंग जरा जास्तच बडबडा होता. मोठा भाऊ हरमीत सिंगचे किस्से तो रंगवून सांगत होता. ऐकण्यात कुणालाच स्वारस्य नसल्याने समोरून ‘हो-हो’, ‘हो का?’ एवढाच प्रतिसाद येत होता. चार तासात सामान उतरवल्या गेले. सरदारजींनी चावी देऊन निरोप घेतला. संध्याकाळ व्हायच्या आत truck तिथून निघाला होता. पुरुषवर्ग कामाहून घरी आल्यावर दिवसा घडलेली सगळी कहाणी त्यांच्या कानावर आलीच. ‘जाऊ द्या... एकदाचं प्रकरण संपले’ असे समजून सगळे परत त्या रात्री शांत झोपी गेले.

तीन-चार दिवसांनी पुन्हा एका सरदारजींचा फोन आला. हरमीत सिंग म्हणजे पहिले सरदारजी; नागपूरला एक-दोन दिवसांत येत आहेत असे त्याने कळविले. तुम्ही कोण असे विचारताच त्याने हरमीत सिंगांचा लहान भाऊ हरबिंदर बोलत असल्याचे सांगितले आणि फोन ठेवूनही दिला. आता मात्र आमचे नातलग चांगलेच वैतागले. हे सरदारजी बंधू बदली करणे... ती cancel करणे... सामान पोहचवणे...दुसरीकडे ते उतरवणे हेच धंदे करतात कि काय असे सगळ्यांना वाटू लागले. कोण सतरा वेळा ह्यांच्या मागे राहणार !! आणि हे असं का करताहेत हे सुद्धा कळत नव्हते. कशाचाच छडा लागत नव्हता. जे होईल ते बघून घेऊ असे ठरवून आमचे नातलग रोजच्या कामाला लागले.

दोन दिवसांनी सकाळीच दारावरची बेल वाजली. हरमीत सिंग आणि कुटुंब दारात उभे होते. इच्छा नसताना केलेले औपचारिक स्वागत झाल्यावर हरमीत सिंगांनी चावी मागितली. आमच्या नातलगांकडून सरदारजींना ‘आता कशाला हवी आहे चावी?’ अशी शक्य तितक्या विनम्रतेने, चेहऱ्यावर त्रासिक भाव न दर्शविता विचारणा करण्यात आली. ‘कशाला म्हणजे काय, आजपासून सहकुटुंब राहायला आलो आहोत’ असे सरदारजींनी सांगताच इकडे सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. बदली cancel झाल्याने हरमीत सिंगांचा भाऊ हरजीत सिंग अगोदरच सामान घेऊन गेला आहे हे कळताच हरमीत सिंगांचे अवसान गळाले. त्यांची पत्नी तर ‘हाय रब्बा’ म्हणत मट्कन खालीच बसली. हरमीत सिंगांनी दार उघडून पाहिले. अर्थातच आत काहीच सामान शिल्लक नव्हते. हळूहळू सगळ्या कथेवरून पडदा सरू लागला. हरजीत सिंग असा कुणी पहिल्या सरदारजींचा भाऊ नव्हताच. चोरांनी कमालीचे planning करून अख्ख्या सामानावर डल्ला मारला होता... सरदारजीने सरदारजीचा पंजाबपासून कित्येक मैल दूर असलेल्या महाराष्ट्रात काटा काढला होता. हरमीत सिंग डोक्याला हात मारून बसले. वाहेगुरूंचा धावा करू लागले. आमच्या नातलगांची तर भंबेरी उडाली. थोडं सावरल्यावर कुणीतरी Police complaint करायला सांगितली. हरमीत सिंगांच्या office मध्ये कळवण्यात आले. Office ची काही लोकं गोळा झाली. Police complaint करण्यात आली. FIR मांडल्या गेला. चौकशी सुरु झाली. Flat च्या घरमालकांना बोलावले गेले. महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांतले पोलीस शोध घेऊ लागले.

चौकशीअंती असे निष्पन्न झाले की हरजीत सिंग आणि हरमीत सिंग यांच्यामध्ये शेतीच्या जागेवरून भांडण होते. पंजाबच्या कोर्टात खटला सुरु होता. याचा फायदा घेत चोरट्यांनी हरजीत चे नाव पुढे करून सर्व कारस्थान रचले होते.
हरजीत सिंगचा या चोरीशी काहीएक संबंध नव्हता. त्याचे फक्त नाव वापरण्यात आले होते. भलत्याच सरदारजीने चोरी केली होती... तेही केवळ हरमीत आणि हरजीत सिंग बाबतच्या पूर्ण माहितीच्या आधारे. 

नागपूरात या घटनेबद्दल बरीच ‘पेपरबाजी’ झाली. जवळपास साडेचार महिन्यांनंतर चोरटे हरियाणा मधून पकडले गेले. हरमीत सिगांना त्यांचे सामान मिळू शकले की नाही ते मात्र समजले नाही. बहुदा चोरट्यांनी विकले असावे.

आमचे नातवाईक तर ‘फेमस’ झाले होते. लोकं त्यांना विविध प्रश्न विचारून हैराण करून सोडत. ते ह्या कथेचा भाग असल्या कारणाने त्यांना देखील पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी झिजवावी लागली. नसती उठाठेव होत होती. सगळं पूर्ववत व्हायला बराच वेळ लागला.

घडलेली ही घटना चांगलीच नाट्यमय होती.

पण एक मात्र मुद्दाम सांगावेसे वाटते; ज्या दिवशी चोरटे पकडल्या गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या नातलगांनी घराच्या वास्तू-पूजनाचा ‘मुहूर्त’ पंचांग न बघता काढला होता.

Sunday 17 March 2013

दूरदर्शनचे दिवस




मागील आठवड्यात Crossword ला जाणे झाले. तिथे गेल्यावर खरेदी होतेच त्यामुळे मध्यंतरी मी Crossword ला जाणे टाळत होतो. या खेपेस देखील वेगळे काही झाले नाही. फिरता फिरता Malgudi Days च्या DVD Pack वर लक्ष गेलं. पुढच्या २ मिनिटात त्याची खरेदी झाली होती. DVD Cover वरील R. K. Laxman यांची ‘मालगुडी डेज’ मधील निरनिराळ्या पात्रांची व्यंगचित्रे बघून एकदम दूरदर्शनचा जुना बहराचा काळ डोळ्यांसमोर उभा ठाकला. एकेकाळी पुरलेला खजिना हाती लागावा आणि तो उघडल्यावर एकापेक्षा एक असे दागिने, हिरे- मोती-माणिक बाहेर काढले जावे असे झाले !!

भारतातल्या ८०-९० च्या दशकात झालेल्या खूप मोठ्या स्थित्यंतराचा दूरदर्शन हा महत्वाचा घटक आहे. अर्थव्यवस्था खुली झाली होती. घरांघरात TV चे पदार्पण होत होते. संध्याकाळी कामं आटोपून लोक TV पुढे विविध कार्यक्रम पाहायला हमखास बसू लागलेत. लहान-थोर सगळेच. मोहल्यात एक-दोन मंडळींकडे TV असला तरी आसपासची तमाम जनता विशिष्ट कार्यक्रम बघायला जमा होत असे. रविवारी रामायण किंवा महाभारत सुरु होण्याआधी TV ची साग्रसंगीत पूजा होऊन त्याला हारतुरे घालण्यात येत. रामायणातला एखादा दुखःद प्रसंग बघून वृद्धांच्या नेत्रकडा ओलावल्या नाही तर नवल !! रंगोली, चित्रहार आणि weekend ला दाखविल्या जाणाऱ्या सिनेमाची नित्यनेमाने व आतुरतेने वाट पाहीली जात असे. एखादा आवडीचा कार्यक्रम सुरु असताना अचानक वीज गेली की लोकांचा तीळपापड होणे साहजिक होते. क्रिकेट Match चा दृक-श्राव्य स्वरुपात मनमुराद आस्वाद घ्यायला सुरुवात झाली होती. जुने सिनेमे बघता येत होते. जगात कुठे काय सुरु आहे ते बातम्यांद्वारे पाहणे शक्य झाले होते. एकूणच काय, देशातल्या जनमानसाला TV बघण्याची ‘सवय’ जडत होती.

माझ्या बाबतीत म्हणाल तर ‘मालगुडी डेज’ ही माझी सगळ्यात प्रिय मालिका. अनमोल ठेवा आहे तो !! मालगुडीचे जनक R K Narayan हे किती थोर साहित्यिक आहेत हे नंतर कळलं. दक्षिण भारतातल्या मालगुडी नावाच्या एका छोट्या Townमध्ये वास्त्यव्याला असलेले स्वामी आणि त्याचे मित्र, जगन मिठाईवाला, नागराज, Talkative Man शेषाद्री, ज्योतिषी, पोस्टमन, नागराज, सिद्धा, ईश्वरन इत्यादी पात्रं अविस्मरणीय आहेत. ह्यातले स्वामी आणि त्याचे मित्र सर्वांत जास्त भाव खाऊन गेले. ही सगळी आपल्यासारखीच माणसं. मानवी नाते-संबंधांचे हळुवार पदर उलगडून दाखवणारी ही हलकी-फुलकी, सुंदर मालिका होती. आज ‘मालगुडी डेज’ वाचल्यावर कळतं की पुस्तकाबरहुकुम त्या मालिकेचे किती सुरेख दिग्दर्शन आणि चित्रीकरण केले होते.

‘फ्लॉप शो’ ही देखील माझी एक आवडती मालिका. जसपाल भट्टी नामक सरदारजी या मालिकेद्वारे घरोघरी प्रसिद्ध झाले होते. समाजात सुरु असलेल्या भ्रष्टाचार, फसवणूक, शासकीय कामांतील दिरंगाई इत्यादी कृष्णकृत्यांचा त्यांनी नर्मविनोदी शैलीत समाचार घेतला होता. बघताना हसून हसून पुरेवाट व्हायची. सुरुवातीच्या Titles मध्ये Misdirected by Jaspal Bhattiअसे दाखवणे आणि शेवटी त्या episode वर बेतलेलं विडंबन गीत सादर करणे ही कल्पना नवीन तर होतीच पण कौतुकास्पद सुद्धा होती. नाव जरी फ्लॉप शो असलं तरी मालिका Super hit होती. आजही DVD वर ते episodes पाहताना त्यातल्या ताजेपणाचा अनुभव येतो.

तसेच Jungle Bookने तर ‘बच्चा कंपनीला’ फार वेड लावले होते. गुलजार साहेबांच्या ‘जंगल जंगल बात चली आहे ...पता चला है... अरे चड्डी पहनके फुल खिला है... फुल खिला है’ या Title Song ला त्याचे श्रेय द्यावेच लागेल. जंगलातले प्राणी कार्टून किंवा animated स्वरुपात पाहण्याची ती पहिलीच वेळ होती. मोगली हिरो होता. शेरखान बद्दल उत्सुकता आणि भीती वाटायची... बगीरा मला खूप आवडायचा... बगीरा,भालू आणि मोगली मिळून त्याला एकदाचे ठार का नाही मारत असा प्रश्न पडायचा. पण तसं झालं असतं तर मालिका लगेच संपली असती हे माझ्या बाल-बुद्धीला कळण्यापलीकडे होते. लहानपणी घरी आलेल्या पाहुण्यांना मी मोगली सारखं धावून वगैरे दाखवत असे. मोगलीच्या त्या boomerang होणाऱ्या लाकडी शस्त्राचे नाव मी नेमके विसरलो आहे परंतु मी तेव्हा ते बनवल्याचे मला स्मरते. फरक एवढाच होता की एकदा ते फेकले की वापस येत नसे. जाऊन आणावे लागे. जंगलाची ही आगळी ‘सफारी’ न विसरता येण्यासारखी आहे. त्याचे videos आता Youtube वर बघता येतीलही पण डोळ्यातले किंवा चेहऱ्यावरचे त्यावेळचे ते कौतुकाचे व आनंदाचे भाव कुठून आणू ? वय वाढण्यापरत्वे innocence ही संपतो.

Prime Time ला लागणाऱ्या मालिकांमध्ये जवळपास सगळ्याच लोकप्रिय झाल्या होत्या. ‘हमलोग’ आणि ‘बुनियाद’ चा प्रत्येक घरात बोलबाला होता. ‘नुक्कड’ ने सगळ्यांना आपलेसे केले होते. लोकप्रियतेचे नवे परिमाण या मालिकांनी गाठले होते. ‘सुरभि’ माहितीचे भांडार उपडे करत होती. ‘भारत एक खोज’ पुन्हा एकदा इतिहासातून फिरवून आणत होती. मध्यमवर्गीयाच्या रोजच्या ओढाताणीचे चित्रण ‘वागले की दुनिया’ मध्ये पाहायला मिळत होते. ‘किरदार’ मध्ये गुलजार साहेबांनी मानवी व्यक्तिमत्वांचे उत्तम नमुने पेश केले होते. नसिरुद्दीन शहांनी अभिनयाच्या ताकदीवर ‘मिर्झा गालिब’ जिवंत केला होता. ‘देख भाई देख’ खऱ्या अर्थाने हसवत होते. ‘तहकिकात’ मधली detective जोडगोळी TV समोर बसायला भाग पडत असे. कठपुतळ्यांच्या माध्यमातून कथा सादर करणारी ‘पोटली बाबा की’, ‘Jungle Book’, ‘He-Man’,’Spiderman’,’Duck Tales’,’Talespin’ सारख्या cartoon serials लहान मुलांसाठी special होत्या.

बंगाली साहित्याचे तर दूरदर्शनच्या मालिका घडवण्यात विशेष योगदान आहे. गुरुदेव टागोरांच्या कथांवर आधारित ‘विविधा’, शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबरींवर बेतलेल्या ‘श्रीकांत’ आणि ‘अरक्षणीया’ ह्या धारावाहिक पाहिल्याचे मला आठवते. तेव्हा त्या तितक्याशा समजत नसल्या तरी त्यातला drama लक्ष वेधून घ्यायचा. कुठेतरी हे संस्कार झाले असतील त्यावेळी; म्हणूनच कि काय मी बंगाली साहित्याच्या प्रेमात पडलो. शरदिंदू बंधोपाध्याय यांच्या रहस्य कथांवर आधारलेली ‘व्योमकेश बक्षी’ ही आणखी एक माझी आवडती मालिका. शेवटपर्यंत रहस्यावरून पडदा हटत नसे आणि अंदाज बांधता बांधता episode संपतही असे.

मराठी मालिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास याकुब सईद यांच्या ‘पुणेरी-पुणेकर’ चा उल्लेख अगोदर करावा लागेल. जातिवंत पुणेकरांच्या खास प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी ही मालिका बघताना मजा वाटायची. त्याचबरोबर ‘महाश्वेता’ ही दुपारी लागणारी मालिका आई नियमित पाहत असे. मी फक्त त्यातले शेवटचे ‘भय इथले संपत नाही ...’ हे गाणं कधी लागतं त्याची वाट बघत असे. हे गाणं आणि ते लिहिणारा पुढे जाऊन आपल्या मनावर एवढं गारुड करेल असे तेव्हा नक्कीच वाटले नव्हते. टिळक आणि आगरकर यांच्यातले वादविवाद, मतभेद यांवर आधारित ‘मर्मबंध’ ही मालिका डोक्यावरून जात असे. ‘गोट्या’ हे मालिकेचे आता फक्त नाव आठवतंय. त्यातला content विस्मृतीत गेला आहे. नववर्षानिमित्ताच्या मराठी कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांचा स्त्री वेषातला अभिनय अजूनही आठवतो. मुलांच ‘किलबिल’ आठवतं. पु.लं च एखाद दुसरं कथाकथन पाहिल्याचे स्मरते. ‘बोक्या सातबंडे’ बऱ्यापैकी आठवतो.

हे सगळं विषद करताना ‘क्रिकेट’ ला कसं वगळू शकतो आपण? दूरदर्शनमूळे क्रिकेटचे सामने घरबसल्या ‘बघता’ येऊ लागले. सचिन तेंडूलकर अद्वितीय कर्तुत्वाच्या जोरावर घराघरात पोहचला होता. त्याला batting करताना बघणे म्हणजे पर्वणी होती (आणि आहे)... एकत्र येऊन कुठल्यातरी दुकानासमोर किंवा घरी match पाहणे आणि six/four मारल्यावर शिट्ट्या, टाळ्या वाजवणे, आरोळ्या ठोकणे ह्याचा आनंद अपरिमित असतो. हा प्रकार क्रिकेटवेड्या भारतीय जनमानसात रुजवण्यास दूरदर्शनचा मोठा हातभार आहे. ९० च्या दशकातल्या त्या World Cup च्या matches... शारजा च्या matches आठवून ‘जाने कहां गये वो दिन..’ असेच म्हणावेस वाटते.

पोतडीतून एकेक खेळणं बाहेर काढावं तसं झालं आहे. लिहावं तेवढं कमी !!

थोडक्यात सांगायचे झाल्यास उत्तम कार्यक्रमांचा पूर्वी सुकाळ व सुवर्णकाळ होता. हमलोग, बुनियाद, रामायण, महाभारत, पोटली बाबा की, किले का रहस्य, नुक्कड, मालगुडी डेज, रहने दो जी, मिर्जा गालिब, वागले की दुनिया, सर्कस, अजनबी, फौजी, तेनाली रामा, Talespin, Duck Tales, बिक्रम और बेताल, मिट्टी कें रंग, गुल गुलशन गुलफाम, भारत एक खोज, किरदार, करमचंद, चाणक्य, CIET तरंग, जुनून, सुरभि, रिपोर्टर, टिपू सुलतान, द ग्रेट मराठा, देख भाई देख, तहकिकात, शांती, अलिफ लैला, तहरीर- प्रेमचंद की, चंद्रकांता, सुराग इतकेच नव्हे तर शक्तिमान देखील TV समोर खिळवून ठेवत. कालांतराने सततचे वाढणारे channels आणि उपलब्ध पर्याय बघता दूरदर्शन स्पर्धेत मागे पडत गेले. पुढे केबल फोफावू लागलं. आता तर गावोगावी Dish/Tata sky दिसू लागलंय. सुमार Entertainment आणि TRP चा नुसता सुळसुळाट झाला आहे. Reality Shows, Comedy Shows आणि विचित्र जाहिरातींचा भडीमार सुरु आहे. बातम्या तर दुथडी भरून वाहत असतात. जेवणं आटोपल्यावर कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र TV बघताहेत हे चित्र इतिहासजमा झाले आहे. कुटुंबसंस्थाच जिथे विस्कटू लागली आहे तिथे आणखी काय बोलावं. !! ‘तनहाई में दिल यादें संजोता है’ ह्या गाण्याच्या ओळीप्रमाणे दूरदर्शनचे ते सुगीचे दिवस कधी कधी आठवतात आणि मन चिंब करून जातात. आमची पिढी तर दूरदर्शन सोबतच मोठी होत गेली. आता रिमोटच्या बटणांवर जगभरातली माहिती क्षणात आणि सहज मिळू लागली आहे पण Life ‘जिंगालाला’ करण्याच्या नादात, Charm मात्र हरवल्यासारखा वाटतो.

शेवटी काय, “कालाय तस्मै नमः” हे सगळीकडे लागू होतंच.

Wednesday 13 March 2013

Platform No. 3


(Ruskin Bond यांच्या Platform No. 3 या कवितेचा अनुवाद)

Platform नंबर ३ वर; प्रवाशाने प्रश्न केला;

“भुताखेतांवर आहे का विश्वास तुझा?”

“विवेकी मनुष्य आहे मी”, मी उत्तरलो

“जे बघतो तेच सत्य- जसे तुझे हात, तुझे पाय, तुझी दाढी ...”

“मग बघ पुन्हा”, तो म्हणाला

आणि... क्षणात अंतर्धान पावला.

वेचलेली फुले...


जात, धर्म, राष्ट्र, विशिष्ट राजकीय विचारसरणी... अमली पदार्थांसारख्या या अमली संकल्पना किंवा मतप्रणाली भल्याभल्यांच्या बुद्धीभ्रमाला कारणीभूत होताना दिसतात. एकीकडून अशा कुठल्यातरी विचारसरणीचा असर, दुसरीकडून विज्ञानाच्या प्रगतीच्या झेपेतून सतत प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या आमच्या गरजा, अशा रेट्यातून माणसाची संवेदनाशक्तीच बोथट होऊ लागली आहे. अशा वेळी प्रश्न आहे तो हा, की सर्वात बुद्धिमान प्राणी जो माणूस, त्याने ‘हा रस्ता अटळ आहे, माझ्या मना बन दगड’ हे सूक्त वाच्यार्थाने घेऊन टणक ‘दगड’ बनत जायचे की ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे सूक्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करून ‘फुलत’ जायचे?

एकट्या मानवजातीचा अपवाद वगळला तर बाकीची सारी चराचर सृष्टी ही एकमेकांत गुंतलेली, एकमेकांच्या सुखदुःखांशी समरस होऊन परस्परावलंबी जीवनचक्रात फेर धरून नाचत, गात जगताना दिसते. या सार्या बंधुभावाशी फटकून वागण्याचा, स्वतः पुढे सारी जीवसृष्टी कस्पटासमान मानून स्वार्थासाठी तिला नमविण्याचा मोह मानवजातीलाच का व्हावा?

प्रत्येक अलौकिकाला शाप हा हवाच का? 

-    (सुनिताताई देशपांडे)

Tuesday 12 March 2013

जीवन-मरण


(आवडत्या कथेचा अनुवाद करण्यात मजा असते असे मला कळून चुकलंय. गुलजार साहेबांच्या एका कथेचा हा स्वैर अनुवाद)


मेजर मानवेंद्रचा म्हातारा काका कुठेही कुणाचाही मृत्यू झाला की एकच पालुपद लावत असे – “अरे, मरणाला कुणीही टाळू शकलं नाहीये.”

पण मानवेंद्रनी जणूकाही पेटून उठून या म्हणीप्रचुर उद्गाराला शह दिला होता. मानवेंद्रच्या जीवनात इतक्या साऱ्या अघटित घटना घडल्यानंतरही तो सुखरूप असल्याचे बघून म्हातारा काका हे वाक्य बोलायला कचरत असे. मेजर मानवेंद्रच्या बाबतीत असं बोललं जायचं की एखादा माणूस घास खातो तसं त्याने मृत्यूला गिळून टाकलंय. मृत्यू आता त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. काही लोक तर असे म्हणत की मृत्युदेवता त्याच्याकडे कित्येकदा प्राणांचे दान मागायला आली... भिक्षेकरी म्हणून !! पण या महाशयांनी तिला हाकलून लावलं.

लहानपणी मानवेंद्रला कुठलातरी आजार जडला होता. जगण्याची कुठलीच आशा शिल्लक नव्हती. आई वडिलांनी डॉक्टर, हकीम, वैद्यापासून जादूटोणा करणाऱ्यां पर्यंत सगळे उपाय केले होते. कुणास ठाऊक, आईची माया होती की डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम; मानवेंद्र बचावला. रिकाम्या हाताने मृत्यू परतला होता. कृश प्रकृतीच्या मानवेंद्रकडे पाहिल्यावर असे वाटे की हा वाचला तर खरं परंतु पुढे जगण्याची शाश्वती कमीच !! हे सत्य होतं कारण काही अवधी उलटताच मृत्यूने त्यावर पुन्हा एकदा हल्ला केला होता. शाळेतून घरी आल्यावर जवळच्या बागेत खेळताना त्याला सर्पदंश झाला. आजूबाजूची मुले घाबरली. कुणीतरी त्याच्या घरी येऊन बातमी कळवली. त्याची आई तडक तिकडे गेली... मुलाला उराशी कवटाळत, आक्रोश करत डॉक्टरकडे घेऊन गेली. विषाने आपले काम करावयास प्रारंभ केला होता. मानवेंद्र बेशुद्ध होता. जखम पाहून डॉक्टर म्हणाले, “एवढा उशीर का केला? साप फार विषारी होता.” डॉक्टरनी त्याचे हात, पाय घट्ट बांधले आणि इंजेक्शन दिले. सोळा तासां नंतर जेव्हा मानवेंद्र शुद्धीवर आला तेव्हा पुन्हा एकदा मृत्यू स्वगृही परतला होता. त्याच्या आईने तर या घटनेनंतर बरेच व्रत-वैकल्ये, नवस वगैरे केलेत.

सापाचं विष काय उतरलं, मानवेंद्रची तब्येत चांगलीच सुधारू लागली. काही वर्षातच तो सुदृढ, राजबिंडा व तरणाबांड दिसू लागला. यौवनाची झलक स्पष्ट दिसत होती. शहरातल्या रस्त्यांवर जेव्हा तो तोऱ्यात गाडी दामटत असे तेव्हा कित्येक तरुणी त्याचाकडे पुन्हा पुन्हा वळून बघत !! कुठलातरी म्हतारबुआ हे पाहून त्याला शिव्यांची लाखोली वाहत म्हणत असे- “च्यायला, मरेल हा एकदिवस लवकर”. पण जणूकाही हे उद्गार मानवेंद्र ऐवजी दुसऱ्याच कुणालातरी म्हटल्या सारखे वाटत.

एकदिवस असे शिव्या-शाप देणार्याचं भाकीत खरं ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या मोटार सायकलचा जबरदस्त accident झाला होता... हातात जिलबीचा चुरा करावा तशी त्या गाडीची अवस्था झाली होती... ट्रकने जोरदार धडक दिली होती. त्या accident मध्ये दुर्दैवीरीत्या आडव्या आलेल्या सायकलस्वारचे शव बाजूलाच पडून होते. Ambulance आली. अर्धमेल्या स्थितीत मानवेंद्रला ICU मध्ये admit करण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छवासावर त्याला ठेवण्यात आले होते. खूप रक्त गेलं होतं. पाच बाटल्या रक्त देऊनही डॉक्टर त्याचा जीव वाचवण्याबद्दल साशंक होते. त्यांनी सरळ सांगितलं होतं- “काही तास शिल्लक आहेत. आम्हाला अजिबात आशा नाही.”

सहा महिन्यानंतर मानवेंद्र घरी परतला होता. त्याच दिवशी त्याच्या म्हाताऱ्या काकाचे उद्गार पहिल्यांदा बदलले होते- “देवा, ह्या पोराला उदंड आयुष्य दे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ हेच सत्य. !!”
वडिलांच्या निधना नंतर मानवेंद्र सैन्यात भरती झाला. दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. परेड करता करता एक दिवस मानवेंद्र ‘फ्रंट’ वर पोहोचलाच. तो सैन्यात काय भरती झाला, बिनबोभटपणे मरणाच्या सापळ्यात वावरु  लागला !! मृत्यूदेवतेला तर आयता बळी पुढ्यात दिसत होता. शत्रूच्या गोटातून सुटलेली गोळी त्याच्या अगदी जवळून गेली... मागचा धारातीर्थी पडला... त्याच्या मृत शरीराला सांभाळता सांभाळता पन्नास एक मीटर वर एक बॉम्बगोळा फुटला... अख्खी फलटण कोसळली... पण मानवेंद्र –

काही दिवसांतच मेजर मानवेंद्र पुनश्च जखमेवरच्या पट्ट्या सोडून मृत्यूशी दोन-दोन हात करायला ‘फ्रंट’ कडे वाटचाल करू लागला... मृत्यूचे दात घशात घालण्यासाठी तो परत एकदा सज्ज झाला होता. पण यावेळेस फासा उलटा पडला.
मानवेंद्र शत्रूच्या हाती लागला. यमराज बहुतेक जाणून होते की ह्याला तुकड्या तुकड्याने मारणेच उचित ठरेल; हा सबंध काही आपल्या जाळ्यात अडकत नाहीये. शत्रूच्या camp मध्ये अर्थातच उपासमार, छळवणूक, अत्याचार इत्यादी विविध रूपांत मृत्यू थैमान घालत होता... यापेक्षा तत्काळ मरण बरे !!

एका camp मधून दुसरीकडे, तिथून आणखी वेगळ्या ठिकाणी असे करता करता त्याचे खूप हाल करण्यात आले. वेळोवेळी उभे ठाकणारे हे मरण या खेपेस विजयश्री खेचू पाहतच होते की ‘द्वितीय महायुद्ध संपुष्टात आले’. कैद्यांच्या झालेल्या स्थलांतरामूळे मानवेंद्रला पुन्हा जीवनदान मिळाले. तो सुखरूप घरी परतला. त्याचा आईला तर आकाश ठेंगणे झाले होते... 

काकांनी दान-धर्म केला... सोहळा साजरा केला, पार्ट्या दिल्या. अशाच एका पार्टीत नेमका फ्यूज उडाला. मानवेंद्र मीटर तपासत होता. विजेच्या अनावृत्त तारेला त्याने नकळत स्पर्श केला.... आणि ....इतकी वर्षं सततच्या हुलकावणीमूळे त्रस्त झालेल्या मृत्यूने एकदाचा सुटकेचा श्वास सोडला. मृत्युदेवतेने अखेर बाजी मारलीच.




-    गुलजार
‘जिंदगी और मौत’....(“रावी पार”)
(अनुवाद : योगेश)