Thursday 12 December 2013

‘सर्वसाधारण’ सभा: (भाग २)

Conveyance deed हा पराकोटीचा complicated आणि गूढ मुद्दा असतो. घराच्या किंवा सोसायटीच्या नावे जागा हस्तांतरीत करणे किंवा सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास ‘मालकीची’ करणे हे बिल्डरचे खरंतर कर्तव्य असते पण इथेच ही लोकं आडमुठेपणा आणि टाळाटाळ करतात. जेव्हा जेव्हा या मुद्द्याची चर्चा होते तेव्हा बिल्डरकडे संशयाच्याच चष्म्यातून बघितल्या जाते. विधातेंनी या मुद्द्याला हात घालत शांत स्वरात बोलणे सुरु केले. ‘त्याचं कसंय की आपल्या इथे फेज-१ आणि फेज-२ अशा दोन्ही फेज साठी आता सोसायटी निर्माण झाल्या आहेत. यांच आता एक फेडरेशन होईल. विविध ठिकाणी या फेडरेशनचे आपल्याला registration करावे लागेल. असे ठरवण्यात आलेय की हे Conveyance deed या फेडरेशनच्या नावे करण्यात येईल. त्याचं कारण की दोन्ही फेज साठी एकच रस्ता वापरण्यात येतो... त्या road वरचे lights वगैरे हे common amenities मध्ये येतात. पुन्हा मार्किंग इत्यादी भानगडी असतात. त्यामुळे दोन Conveyance deeds वेगळे करण्यापेक्षा एकाच फेडरेशन च्या नावे करूया...’
हे ऐकून सभेत एकच गहजब झाला. ‘नाही...नाही’... ‘हे शक्य नाही’...’अमान्य आहे’... not done असे आवाज ऐकू येऊ लागले. विधातेंनी सगळ्यांना शांत बसण्याचे आवाहन केले पण कुणी ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हते. थोडक्यात बिल्डरने बॉम्ब टाकला होता. शेवटी हंगामी समिती मधल्या एक-दोन लोकांनीच सभेला शांत करण्याचे प्रयत्न सुरु केले. ह्या घटनेचे संक्षिप्त रेकोर्डिंग येणेप्रमाणे-

‘मी म्हटलं होतं ना... हा आडी टाकणार.’
‘हे फार serious आहे बरं का देवकाते साहेब... आपल्याला सांभाळून आणि strategically पुढे जावे लागेल.’
Strategy गेली मसणात... direct सांगा जमणार नाही... सभेला अमान्य आहे म्हणून.’
‘अहो पुरंदरे वहिनी... आमच्या रोहिणीच्या बिल्डरनी पण केवढा वेळ लावला होता... बापरे... सगळे बिल्डर मेले सारखेच...आणि तिचं तर 4BHK Row House आहे.’ (प्रस्तुत वाक्य कानामात्रेसहित जसे च्या तसे इथे लिहितोय कारण हे मला edit करावेसे वाटले नाही... खासकरून “4BHK Row House...असते एकेकाची प्रवृत्ती... जाऊ द्या.)
‘(फोनवर) अगं सुनयना... मला वेळ होईल यायला बहुतेक... लांबेल ही मिटिंग... तुम्ही लोकं जाऊन या मिनेकडे.’
‘ये उल्लू बना राहा भाई अपनको. इसको तो accept करना ही नही किसीभी हाल में.
No..No..No
‘काय फालतुगिरी आहे राव...’
एक मनुष्य उभा राहून विधातेंना तार सप्तकात ओरडून सांगू लागला, ‘पुण्यात या घडीला ८५% Conveyance deed pending आहेत. आम्हाला आमच्या सोसायटीच्या नावे हे deed पाहिजे... फेडरेशन बीडरेशन आम्हाला माहित नाही.’
Finally गेम केलाच यांनी.’
‘तुम्ही reputed बिल्डर आहात... This wasn’t expected from you, sir.’
‘च्यामारी ... तुम्ही कशाला सर बीर म्हणताय त्याला.’ (एक खालच्या पट्टीतला स्वर)
‘काय झालं... काय म्हणाला हा विधाते Advocate? मी call वर होतो.’
(आजूबाजूच्या मोजून चार लोकांनी कपाळावर हात मारला.)
‘हे असंय... ह्याचं आपलं फोनवर वेगळंच deed सुरु आहे.’
Deed नाही, Deal चालू असेल... हाहाहाहा.’
‘निशा, समोरच्या लाईनीत ये ना... तुला ऐकू येतेय का तिथे?... important point आहे हा.’
‘मम्मीSSS... चल ना... भूक लागली ना.’

विधातेंनी सभेचा ‘राग’रंग बघून अखेरचा प्रयत्न म्हणून कारणे सांगायला सुरुवात केली, ‘Individual Conveyance deed द्यायचे झाल्यास Remarking करावे लागेल. तसा plan तयार करून submit करावा लागेल. हा वेळखाऊ प्रकार आहे...’. विधातेंचे बोलणे अर्धवट तोडत भाई तेलंग करारी आवाजात त्यांना उद्देशून म्हणाले, ‘अहो विधाते, कसलं demarcation? Plan sanction होतो तेव्हाच हे सगळं केलं जातं. दुधखुळे समजले की काय आम्हाला? म्हणे Remarking. स्पष्ट बोला.’ एव्हाना विधातेंची बोबडी वळली होती. ते पाहून बिल्डरने स्वतः माईक हाती घेतला.
बिल्डर ने गंभीर आवाजात बोलणे सुरु केले, ‘तुमचा रोष मी समजू शकतो पण ही सगळी कामं शक्य तितक्या लवकर complete व्हावीत एवढाच आमचा हेतू आहे. त्याकरीताच फेडरेशनच्या नावे deed करायचा विचार होता. शेवटी सर्व तुमचंच आहे. आम्ही हातचं राखून थोडीच काही करणार आहोत.’

तेलंग काकांनी उत्तरादाखल असे सांगितले की अजून दोन wings चे काम सुरुय. ते कधी होईल ते सांगता येत नाही. या तिसऱ्या फेज च्या completion नंतर समजा बिल्डरने फेडरेशन करायचे ठरवले तर सगळी कामं ‘अनिश्चित काळासाठी’ स्थगित होतील. ज्या दोन फेज पूर्ण झाल्या आहेत, त्यांची कामं मार्गी लागणे ही priority आहे.
बिल्डरचे ‘हो-नाही’ सुरूच होते. विविध प्रकारे तो लोकांना समजावयाचा प्रयत्न करत होता पण लोकांनी त्याच्या म्हणण्याला अजिबात भिक घातली नाही. अखेरीस बिल्डरला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि प्रत्येक सोसायटीच्या नावे खरेदीखत करायचे ठरवल्या गेले.

MoM मध्ये लिहून घ्या... put it down on paper आणि वाचून दाखवा आम्हाला... शिंदे काका बघा बरं जरा काय लिहिलंय त्यांनी’, एक चतुर माणूस ओरडला. बिल्डर शेजारी बसलेल्या एकाने सगळे व्यवस्थित टिपले होते आणि ते त्याने हंगामी समितीतल्या काही सदस्यांना वाचून पण दाखवले. आमचा बिल्डर मुरलेलं जुनं लोणचं असल्याने त्याला या गोष्टींची सवय असावी. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव उमटले नव्हते. लोकांच्या चेहऱ्यावर मात्र विजयश्रीचा आनंद ओसंडून वाहत होता. तेलंग काकांनी उगाच आपल्या भरगोस मिशीला पिळ दिले. झालं, एकदाचा समेट घडला. संसदेत मांडली असतात तसली बाकं तिथे असती तर या महत्वाच्या मुद्द्याला approval देताना खरोखर ‘आव्वाज’ झाला असता. आता लोकांचे टेंशन जरा कमी झाले होते. सभेतील वातावरण जरा निवळतेय असा भास होत असतानाच, मुळीक नावाच्या एका इसमानी आणखी एक ज्वलंत मुद्द्यात रॉकेल ओतले... Approach Road.


(क्रमशः)

Tuesday 26 November 2013

‘सर्वसाधारण’ सभा: (भाग १)

मागील शनिवारी भर दुपारी दाराची बेल वाजली. वामकुक्षीचा बोऱ्या वाजवायला आता कोण आलंय हा विचार करीत दार उघडलं. कुरियर होतं. नव्या flat च्या बिल्डर कडून पत्र आलं होतं. सोसायटीची नोंदणी झाली होती. ‘सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ असे बिरूद आता लागले होते. बिल्डरने पहिल्या सर्वसाधारण सभेचं आयोजन केले होते. नव्या सोसायटीच्या हंगामी समितीची स्थापना होणार होती. एकदा सोसायटी निर्माण झाल्यावर विविध बाबींची हस्तांतरण प्रक्रिया महत्वाची असते. एकूण प्रकार तसा क्लिष्ट असतो आणि तो समजावून घेणे आवश्यक असतं. त्यामुळे हजेरी लावणं क्रमप्राप्त होतं. सभेचं आयोजन पुढल्या आठवड्यात रविवारी करण्यात आलं होतं. दिवस सगळ्यांसाठी सोयीस्कर होता.

रविवारी नियोजित वेळेला पोहोचलो. सभेच्या ठिकाणी जाण्याआधी Club House मध्ये सहज डोकावून गेलो. TT टेबल आणि कॅरम बोर्डची भर पडलेली दिसली. जिम मध्ये देखील एखाद-दोन यंत्रांची संख्या वाढलेली होती. ‘चला, आता लवकर इथे राहायला यायला हवं’ अशी मनाशी खुणगाठ बांधत Community Hall जवळ आलो. त्याशेजारी एक मोठा लॉन आहे. तिथे खुर्च्यांची मांडामांड सुरु होती. शे-दीडशे खुर्च्या होत्या. गर्दी तशी नव्हतीच. कामगार वर्ग त्यांच्या कामात गर्क होता. सभासदांपैकी १०-१२ लोकं आली होती आणि एक ग्रुप करुन बसली होती. बिनओळखीचे चेहरे जास्त. पण एवढ्यात एक ओळखीचा चेहरा दिसला. पांडेजी... आमच्या बिल्डरचा हा उजवा हात. कुठलीही समस्या असेल तर हमखास पांडेजीनां फोन करा. हा माणूस ती समस्या सोडविण्यासाठी काहीतरी खटपट करतोच असा माझा तरी अनुभव आहे. ‘दबंग’ मनुष्य. ‘तोटीतून पाण्याची धार कमी येतेय’ इथपासून ते ‘अमुक ठिकाणचा power point बदलून तमुक ठिकाणी लावायचा आहे’ पर्यंत कुठलेही काम असेल; त्याकरीता पांडेजी हे Single Point of Contact. पांडेजीनां तीन-चार वेळा मी कामानिमित्त त्रास दिला असल्याने ते मला चांगलं ओळखतात. त्यांच्याशी हस्तांदोलन करून पुढे आलो. खुर्च्यांच्या रांगांसमोर सन्माननीय व्यक्तींसाठी छोटं स्टेज बनविण्यात आलं होतं. त्याच्याच उजव्या बाजूला माईक वगैरे करिता लागणारी यंत्रसामग्री ठेवली होती. Wires अजूनही अस्ताव्यस्त पडून होत्या. नेहमीप्रमाणे त्या wires मध्ये पाय अडकून मी अडखळलो. हे माझ्याबाबतीत नेहमीच घडतं. का ते कुणास ठाऊक !! अखेर तिसऱ्या रांगेतील एक जागा मी पटकावली आणि सभा कधी सुरु होते याची वाट बघत बसलो. अशा सभेला येणे ही काही माझी पहिली वेळ नाही. सध्या जिथे राहतोय तिथे सोसायटी मिटिंगच्या अनेक हिंस्र आवृत्त्या मी पाहिल्या आहेत. तिथल्या किस्से-कहाण्यांवर मी पूर्वीही लिहिले आहे. परंतु ही स्वतःच्या घरच्या सोसायटीची पहिली मिटिंग !! त्यामुळे वेगळाच उत्साह होता.

भारतीय परंपरेनुसार हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली होती. थोड्या वेळात एक professional फोटोग्राफर आणि video shooting करणारा इसम अशा दोन व्यक्ती आत आल्या. हे नवीनच होतं. यांची खरंतर काहीच गरज नव्हती. ह्या मिटिंग चे Live Telecast तर होत नाहीयेना अशी धास्ती वाटून, मागे एखाद्या वृत्तवाहिनीची OB Van दिसतेय का, ते मी पाहू लागलो. पण तसे काही नव्हते. काही वेळाने पलीकडे ठेवलेल्या यंत्रसामुग्रीतून संगीताचे मंद (की सांद्र?) सूर ऐकू येऊ लागले. हे सगळं करण्यामागे नक्की कुणाचं डोकं याचा विचार मी करू लागलो. कारण सभेसाठी उत्तम arrangement करण्यात येत होती. ‘सवाई गंधर्वला’ आमचा बिल्डर sponsorship देतो म्हटल्यावर त्याच्यासाठी असं काही करणं ही क्षुल्लक गोष्ट असावी. बिल्डरच्या ‘व्यावसायिकतेला’ दाद देण्यापलीकडे पर्याय नव्हता. खरा धक्का तर पुढे होता. एव्हाना बरीच लोकं जमली होती. केवळ मागच्या काही रांगा रिकाम्या होत्या. मागून एक कामकरी पोऱ्या पुढे आला आणि एक एक करून प्रत्येकाच्या हातावर अत्तर लावू लागला. मला संगीत-नाटकाला आल्यासारखे वाटत होते. समोर कुणीतरी चकोर उभा ठाकून, ‘गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी... हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी’ हे प्रासादिक नाट्यपद आता गाणार अशी खात्री वाटत होती. ‘आपण नक्की सोसायटी मिटिंगलाच आलो आहोत ना?’ याची एकदा खातरजमा करावी असे वाटू लागले कारण वातावरण एखाद्या समारंभाचेच होते. बिल्डरच्या Image Management’ चे कौतुक करावे तेवढे कमीच होते.

सुमारे अर्ध्या पाउण तासानंतर मान्यवर व्यक्तींचे आगमन झाले... निदान असे वाटत तरी होते. स्टेजवरील खुर्च्यांवर तीन-चार लोकं स्थानापन्न झालेली होती. माईक टेस्टिंग झाले. आणखी एक-दोन जणं आली... त्यांच्या हातात फाईल्सचा गठ्ठा होता... शिल्लक असलेल्या खुर्च्यांवर ती दोघं बसली. त्या मानाच्या खुर्च्यांमध्ये एक खुर्ची पांडेजींची होती हे वेगळे सांगायला नको. विशेष म्हणजे पांडेजी बिल्डरच्या ‘उजव्या’ हाताला बसले होते. हा निव्वळ योगायोग होता की त्यांची नेहमीची सूचक सवय ते मात्र माहित नाही. समोर बसलेल्या मान्यवरांमध्ये पांडेजी आणि बिल्डर हे दोघेच लोकांच्या ओळखीचे होते. इतर चेहरे परिचित नव्हते. इकडे जमलेल्या लोकांच्या आपापसात चर्चा, गप्पा वगैरे सुरु होत्या. माईकवरून आता hello..hello चे आवाज येऊ लागले होते. लोकांचा कोलाहल कमी झाला. स्टेजवर एक इसम हातात कागद घेऊन बोलू लागला. बिल्डरचा  Legal Adviser अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली. सभेची आवश्यकता आणि प्रारूप सांगायला त्याने प्रारंभ केला. अटल बिहारी वाजपेयींपेक्षा याचे pauses मोठे असल्या कारणाने लोकांत चुळबुळ सुरु झाली. 
त्या pauses दरम्यान काही संवाद मला ऐकू आले ते असे-

‘याचा मराठीचा मेजर problem दिसतोय.’
‘अहो, मराठीच आहे. भाषेवरून सोलापूरचा वाटतोय.’
‘हा पाठ करून आलाय का?... सगळं विसरलेला दिसतोय.’
‘ह्याने Legal Adviser म्हणून इतकी वर्षं कशी काय नोकरी केली काय माहित !!’
‘अहो मला माहितीये हा... साधा माणूस आहे बिचारा...प्रामाणिक आहे... बोलताना सावकाश विचार करून बोलतो तो.’
‘ह्या... हा Advocate आहे असे वाटतंच नाही. एक केस तरी जिंकलाय का विचारा त्याला जरा... बावळट.’
‘जाऊ द्या हो... आपल्या कामाशी मतलब ठेवावा आपण... उगाच फाजील टीका काय कामाची.’
‘आम्ही काय बोलणार !! तुमच्या line मधला ना तो.’
‘(फोनवर) अगं, gas बंद केलाय का बघ जरा. मी आलेय खाली.’

या दरम्यान Legal Adviser Mr. विधाते शांतपणे, सभेपुढे प्रस्तुत असलेले मुद्दे एकेक करून समजावून सांगत होता. सगळ्यात अगोदर सहकार खात्याकडून मंजुर होऊन आलेल्या नियमांची माहिती तो सांगू लागला. आतापर्यंत जमा झालेला maintenance चा पैसा आणि बिल्डर ने केलेला खर्च यामध्ये तफावत आढळली. सगळा हिशेब त्याने सोबत आणला होता. लोकांची पुन्हा कुजबुज सुरु झाली. आज सभासदांची नवी हंगामी समिती स्थापन होणार होती. त्यासाठी विधातेंनी आवाहन केले की तुम्ही आधीच ठरवलं असेल तर यादी द्यावी अन्यथा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याची तरतूद आहे. हे ऐकून एक काका लगेच उभे राहिले आणि बोलू लागले... 
‘मी भाई तेलंग... आम्ही आमच्यात दोन-तीन मिटिंग घेतल्या होत्या. सर्वानुमते नावांची एक यादी अगोदरच बनवलीये.’ काका बहुतेक Retd. कर्नल असावे... झुबकेदार मिश्या, धिप्पाड शरीरयष्टी आणि आवाजातील जरब पाहून असेच वाटत होते. विधाते यादी वाचता वाचता कुठलेतरी एक-दोन मुद्दे मांडत होता. माझे लक्ष मागील रांगेतल्या लोकांच्या बोलण्यावर !! विधाते च्या long pauses दरम्यान मला ऐकू आलेले काही short संवाद असे-

‘तेलंग फारच dashing दिसतोय. हा माणूस हवा कमिटीत... कारण कसं आहे की बिल्डर च्या उरावर बसणारी व्यक्ती कमिटीत असणे गरजेचे असते.’
‘कसलं काय... काही लोकांना पुढे पुढे करण्याची सवय असते... show off.
‘अरे... तेलंग काका जबरी आहे...सांगतोय ते ऐक.’
‘पण आधीच कशी नाव ठरवली?... काही पत्ताच नाही... आपण पण दिली असती नावं.’
‘देशपांडे.. जरा नोटीस बोर्ड वाचावं... बोर्डात होते ना तुम्ही नोकरीला!!...हाहाहाहा.’
‘अहो, तुम्ही नाव द्यायला पाहिजे होतं.’
I’m too busy to handle these worldly affairs, you know.’


विधातेंनी सभेचा सूर पकडून असं जाहीर केलं की आणखी तीन नावं सुचवावी... मुख्यतः जे समोर बसलेले आहेत त्यांच्यातून !! एकूण १५ नावं हवी होती. देशपांडे काकांना उद्देशून त्यांचा बाजूचा म्हणाला- ‘आता chance आहे की तुम्हाला. तुमचं नाव सुचवतो.’ लगेच देशपांडे काका घाबरून म्हणाले,’नको...नको. जाऊ द्या. आता काही इच्छा नाही माझी. Next year बघू.’ जमलेल्या लोकांतून दोन काकू आणि एक काका अशा तिघांनी पुढाकार घेतला आणि स्वतःचे नाव नोंदवले. झालं... समिती गठीत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष इत्यादी पदांचे वाटप झाले. पुढील एक वर्षासाठी ‘बिल्डर आणि आम्ही’ यांच्यामधील दुवा किंवा multiple point of contact हे १५ शिलेदार असणार होते. हंगामी संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. टाळ्यांचा कडकडाट झाला. हास्याचे काही स्फोट झाले आणि तशातच विधातेंनी आपला मोर्चा पुढील महत्वाच्या व संवेदनशील मुद्द्याकडे वळवला... ‘खरेदीखत’... अर्थात conveyance deed’.

(क्रमशः)

Monday 21 October 2013

अजानवृक्षाच्या छायेत


‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या उक्ती प्रमाणे ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मी पदरात पाडून घेतले आणि माउलींच्या भक्तिरसात न्हाहून निघाल्याची चैतन्यमय अनुभूती झाली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि दिव्यतेने उजळून निघालेल्या त्यांच्या अलौकिक आयुष्याबद्दल, दोन ओळी देखील लिहिण्याची पात्रता माझ्यात नाही; हे पूर्णपणे जाणून प्रस्तुत लिखाण करीत आहे. ‘मोगरा फुलला’ ही विलक्षण कथा आणखी चार लोकांनी वाचावी एवढे सांगण्यासाठीचा हा केलेला अट्टाहास !! हे पुस्तक माझ्या हाती पडणे हा मी तरी एक शुभसंकेतच मानतो. ‘धर्म’ ह्या मानवनिर्मित संकल्पनेचा मूळ गाभा सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून सर्वत्र गोंधळाची व अविश्वासाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वयंघोषित बाबा आणि साधू लोकांनी सध्या धर्माचा बाजार मांडला आहे. जन-मानसामध्ये निवास करीत असणाऱ्या नकारात्मकतेचे आणि भयाचे भांडवल करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याची सोय ह्या लोकांनी चतुराईने करून ठेवली आहे. ह्या एवढ्या पसाऱ्यात मोठ मोठी धार्मिक संस्थाने कशी काय मागे असणार? कुठलेही कष्ट न उचलता अमाप काळ्या पैशाचे ते धनी बनले आहेत. विविध राजकीय पक्षही धर्माची (आणि सर्वधर्मसमभावाची) पताका आम्हीच उंचावली आहे असे भासवीत आहेत. प्रत्येकवेळी विवेकाचा पराभव होत आहे. ‘स्व’त्व हरवलेल्या सामान्य माणसानी यातून कसा मार्ग काढावा यासाठी एकच तरणोपाय आहे आणि तो म्हणजे संत-साहित्याच्या ‘अभ्यासाचा’ व तद्नुसार आचरण करण्याचा... खासकरून ‘श्री ज्ञानेश्वरीचा’ !! महाराष्ट्राला संतांची आणि संत-साहित्याची विशाल परंपरा लाभली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ तर सर्व ग्रंथांचा शिरोमणी... कालातीत महाग्रंथ... ज्ञानदेवांच्या स्वानुभूतीतून, प्रज्ञेतून, प्रतिभेतून, ज्ञानातून, वाग्यज्ञातून, जाणीव-नेणीवेतून प्रसवलेला महाग्रंथ... नुसतं पारायण करून गंध, फुले वाह्ण्यासाठीचा नव्हे तर त्यात लिहिलेलं प्रत्यक्ष जीवनात आचरण्याचा. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणतात ते उगाच नाही.

‘मोगरा फुलला’ ही कहाणी त्या ज्ञानेश्वरीच्या राजमार्गाकडे नेणारी एक सुबक पाउलवाट आहे. गो. नि. दांडेकरांनी ही कादंबरी लिहून आपल्यासारख्यांचे एक प्रकारे पथ-प्रदर्शनच केले आहे. हे लिखाण पुन्हा आपल्याला त्या ‘ज्ञानियांच्या राजाची’ महती आणि गरज सांगून प्रकाशाची नवी कवाडे उघडी करते. ही गाथा आहे अवघ्या ब्रह्मांडाची ‘माउली’ झालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची, त्यांच्या माता-पित्याची, त्यांच्या भावंडांची... त्यांनी सोसलेल्या अपरिमित हालअपेष्टांची... आणि ह्या सगळ्यांची आयुष्ये अगदी जवळून बघितलेल्या भट्टदेव व कावेरी या पात्रांची. सन्यस्त धर्माचे पालन करीत हिंडणारा भट्टदेव नावाचा जोगी आणि ज्ञानेश्वरांच्या मातेची सखी असलेली कावेरी ह्यांच्या मुखाद्वारे या कुटुंबाचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरांचे पिता श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीदेवी ह्यांचे पुर्वायुष्य, विवाहोत्तर कष्टप्रद जीवन, विठ्ठलपंतांनी धरलेली विरक्तीची कास, ‘प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडून मग परमार्थ साधावा’ असा त्यांच्या गुरूंनी दिलेला आदेश, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमाकडे परतताना विठ्ठलपंतांना करावे लागलेले प्रायश्चित्त, धर्मशास्त्री आणि पांडित्याचा टेंभा मिरविणाऱ्या ब्राह्मणांकडून कुळकर्णी कुटुंबाला वाळीत टाकणे, चार अलौकिक पुत्रांचा जन्म, श्री निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर जवळ अकल्पित व अद्भूतपणे प्राप्त झालेली ‘नवनाथां’तील श्री. गहिनीनाथांची दीक्षा व ईश्वरानुभूती, “मुलांच्या भवितव्याची काळजी असेल तर देहत्याग करावा लागेल” असा विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीदेवीला ब्राह्मणांनी दिलेला आदेश, त्या दोघांचा देहत्याग, त्यानंतर उघड्यावर पडलेल्या चारही भावंडांची झालेली फरफट आणि वानवा, संन्याशाची पोरे म्हणून त्यांच्या वाटेला आलेला अपमान आणि घृणा, विपरीत परिस्थितीतही समाजाचेच हित चिंतण्याची ह्या भावंडांची वृत्ती, श्री सार्थ ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि माउलींच्या संजीवन समाधी पर्यंत प्रत्येक घटनेचे रसाळ आणि हृदयस्पर्शी वर्णन गो.नि. दांडेकरांनी करून ठेवले आहे.

‘मोगरा फुलला’ चे निमित्त होऊन कालच आळंदीला माउलींच्या भेटीला जाऊन आलो. वेगळ्याच प्रसन्नतेचा अनुभव आला. किती पवित्र जागा !! ७००-८०० वर्षं उलटून गेलीत. आजही माउलींच्या प्रेमापोटी लोक इथे भक्तिभावाने येतात... आणि यायलांच हवं. जातीपातींच्या कक्षेत गुरफटलेल्या समाजात सगळे भेदभाव विरून ज्ञानाची गंगा वाहती व्हावी आणि ‘मनुष्य धर्म’ वृद्धिंगत व्हावा यासाठी किती सोसलंय माउलींनी !! विद्वत्ता, कर्तुत्व, मान-सन्मान, अश्रद्धा, अहंम ह्या प्रवृत्ती त्यागून त्यांच्या चरणी लीन व्हावं. ज्या अजानवृक्षाखाली माउलींनी संजीवन समाधी घेतली त्याच्या छायेत क्षणभर विसावलो. नाना विचारांचे मोहोळ उठले—

सुवर्णपिंपळाखाली विराजमान असलेले ज्ञानदेवांचे कुलदैवत श्री सिद्धेश्वर महादेव कितीतरी प्रसंगांचे साक्षीदार असतील !! कशी असतील ही भावंड?... कसे असतील यांचे माता-पिता?... किती अवहेलना आणि अपमान सहन केला त्यांनी !! घरात अठरा विश्वे दारिद्र्य... वडील भिक्षा मागत... निरुपण, प्रवचन करीत... असल्या अवघड परिस्थितीतही चारही मुलांना या माता-पित्याने सांख्य, उपनिषद, वेदांतापासून ते तर्क, मीमांसा, भगवद्-गीते पर्यंत अध्यात्मशास्त्राच्या सगळ्या विषयात पारंगत केले... उत्तम संस्कार केले... त्यावेळी ग्रंथ उपलब्ध नव्हते... जे पाठ केले ते सांगावे लागे... माता-पित्याच्या देहत्यागानंतर कसे काढले असतील या मुलांनी दिवस?... उन्हातान्हात, थंडी-पावसात एवढीशी ही पोरं माधुकरी मागत हिंडायची... काय दिलं समाजानी यांना?... उपेक्षा... छळ... बहिष्कार... ब्राह्मण वर्गाने वाळीत टाकले यांना... का? तर धर्म भ्रष्ट होईल म्हणून !! हा कुठला धर्म?... कर्मकांड आणि तथाकथित ब्रह्मवृन्दांच्या अहंकाराला पोषित ठेवणाऱ्या रूढी यांच्या आहारी जाऊन धर्म, शास्त्र आणि नीती च्या गफ्फा मारणाऱ्या ब्राह्मण वर्गाने केवढे मोठे पातक करून ठेवलेय... ती पोरं भिक्षा मागायला आलेली असताना ही लोकं त्यांच्या झोळीत शेण, कचरा इत्यादी टाकत असत... कुठलीही प्रतिक्रिया न देता, शांतपणे समस्त जनांच्या कल्याणाची कामना करीत ही पोरं पुढे चालू लागत... ह्या सगळ्याचा विचार करता करता, मन विषण्ण झाले. ज्या पापाला कुठलेही प्रायश्चित्त नाही असे काम आमच्या पूर्वजांनी करून ठेवले आहे हे खेदाने सांगावेसे वाटते... ह्यांचीच पापं आम्ही आता धुवत आहोत का?... खरोखर संताप येतो... बरीच लोकं संपूर्ण कुळातील मृतात्म्यांच्या मुक्तीसाठी वगैरे भव्य-दिव्य असे अनुष्ठान, पूजा-अर्चा, भंडारा वगैरे करतात... मनात एक असा प्रश्न उपस्थित झाला की, का म्हणून ‘अशा’ पूर्वजांसाठी वेळ वाया घालवायचा? महाराष्ट्राचा गेल्या हजार वर्षांचा इतिहास बघता; सोवळे ओवळे, जेवणावळी, मिथ्याहंकार, रूढी, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद अशा भ्रामक कल्पनांमध्येच ब्राह्मणांनी आपल्या पिढ्यानपिढ्या खर्ची घातल्या आहेत...
माउलींनी मात्र अशा खल प्रवृत्तीच्या लोकांचा दुष्टपणा जाऊन त्यांच्या ठायी सत्कर्म करण्याची इच्छा होओ ही प्रार्थना करून त्यांना क्षमा केली आहे. ‘माउलीच’ ती !!

ही कादंबरी वाचता वाचता बरेच ठिकाणी थबकलो... एक प्रसंग असा--
समाजाने वारंवार ज्ञानदेवांच्या माता-पित्यास निंदिले... एके दिवशी क्षुब्ध होऊन ज्ञानदेवांनी कुटीची ताटी लावून घेतली आणि ते आसनस्थ झाले. काळजीपोटी निवृत्तीनाथ कुटीबाहेर येरझरा घालू लागले... तेव्हा मुक्ताईने ताटीचे अभंग म्हणून ज्ञानदेवांची समजूत घातली... “योगियांचा योगी तू... ज्ञानियांचा ज्ञाना... तू का म्हणून स्वतःस क्लेश करून घेत आहेस?”
ती भरभरून गाऊ लागली--
                               योगी पावन मनाचा |
                               साहे अपराध जनांचा ||
                               विश्व रागे झाले वन्ही |
                               संती सुखें व्हावे पाणी ||
                               शब्द-शस्त्रें झाले क्लेश |
                               संती मानावा उपदेश ||
                               विश्व पट, ब्रह्म दोरा |
                               ताटी उघडा ज्ञानेश्वरां ||

केवढीशी ही मुलगी !! आपल्या थोरल्या भावाला समजावत त्याला सांत्वनपर, प्रेमळपणे उपदेश देत आहे. कुठून स्फुरले तिला हे?... केवढी ही प्रगल्भता !! हा केवळ प्रतिभेचा अविष्कार नाही... हे स्वयंभू असे संचित आहे... आणि त्याचे उदात्त आणि सुंदर प्रकटीकरण आहे. हे कल्पनातीत आहे... कुठल्याही तर्काच्या आणि बुद्धीच्या तराजुतून हे तोलता येत नाही... प्रज्ञा, मेधा, प्रतिभेच्या पलीकडील आहे हे सर्व... ती म्हणतेय, ‘विश्व पट, ब्रह्म दोरा’... अचानक Quantum Physics मधील ब्रह्मांडाचे कोडे सोडवायच्या प्रयत्नांत असलेल्या String Theory व त्या निगडीत framework ची आठवण झाली... आश्चर्यकारक अशी analogy... ७००-८०० वर्षांपूर्वी एवढे गूढ सत्य ही छोटीशी मुलगी बोलून जाते... काय म्हणावं याला?... पृथ:करण करणे आपल्या क्षमते बाहेरचे आहे !!

आणखी एक प्रसंग... निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना जेव्हा संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली ज्ञानगंगा सामान्य लोकांसाठी मुक्त करण्याचा आदेश देतात तो प्रसंग किती सुरेखपणे वर्णिला आहे !!
भोवताली जनसमुदाय. ज्ञानेश्वर निरुपणास सुरुवात करतात... मनुष्यात विद्यमान असलेल्या सामर्थ्याचे ते वर्णन करतात--
“जन्म मृत्युरूपी चक्रावर घातीलेले हें मृतीकापात्र- आगी लागल्यावरी ज्याची चिमुटभरी राख होवोन आकाशी उधळते- ऐसें हे शरीर-
मात्र त्यातील “प्रज्ञा”-
जिच्यामध्ये ब्रह्मांड कव घालायचे सामर्थ्य !
केवळ तिच्या बळावरी आकाशींच्या नक्षत्र तारकांचे वेध घेता येताती-
पृथ्वी म्हणजे काय... आप म्हणजे काय... तेजाचे रूप काय... वायू कैसा, केवढा?
हे सर्व आकळण्यायेवढा ज्या बुद्धीचा आवाका-
तिणे या आवघ्यातून थोर जो परमात्मा- त्याचे ध्यान काय म्हणोन न करावे?
मत्त गजास आकळण्याचे ज्याचे अंगी सामर्थ्य, त्याने मुखावर घोंगावणारी मुरकुटे काय मारीत बैसावे?
साती सागर पैल जाण्याऐसा जो बळीवंत त्याने थिल्लरातं काय म्हणोन तृप्तता अनुभवावी?
दाही दिशा ओलांडण्याची शक्ती ज्याच्या पंखांमध्ये त्याने येका पिंजऱ्यात काय म्हणोन संतुष्ट असावे?
जो सगुण आणि निर्गुणही आहे-
जो साकार आणि निराकार-
जो सूक्ष्म आणि स्थूल-
जो दृश्य आणि अदृश्य- किंबहुना जो परेपलीकडला, तो जर भक्तीमुळे वश करिता येतो, तर काय म्हणोन करू नये?”
अमोघ वाणी... ज्ञानामृत.

असेच एकदा, पंढरीच्या ‘नामदेव’ नामक वेड्या विठ्ठलभक्त भेटीला माउली स्वतः तिथे गेली... त्यास काही गुज बोलावयास.
ज्ञानदेव म्हणाले, “नामा, कुणीही कर्म त्यागू नये. देव, तीर्थयात्रा, भजन हे जाणत्याने सांडो नये. तीर्थयात्रा केल्याने प्रवास घडतो. जनलोकांचे कळते. कष्ट सोसावे लागताती. तितिक्षा अंगी बाणते.”
नामा म्हणाला, ”देव सर्वत्र येकच. हा पंढरीशच नानां रूपे नटला आहे. तीर्थयात्रेसी येवोन मी काय करू?”
“पण हे ध्यानी येण्यासाठी ती नानां रूपे डोळेभरी पाहिली पाहिजेती. ती अवलोकील्याविना त्याचे व्यापकपण नेटके ध्यानी-मनी येत नाही”.

संत नामदेवांचा अर्धवट डूचमळणारा कुंभ माउलींना पुर्ण भरावयाचा होता. 

‘देव सगळीकडे आहे’; पण हे नुसतं बोलून कसं भागेल !! 

विविध क्षेत्रांचे तीर्थाटन, तिथल्या दैवतांची, लोकांची नाना रूपे, विविधता, सहवास, कथा, श्रवण-कीर्तन हे अनुभवल्याशिवाय ही उक्ती सार्थ होत नाही. एकाच फळाच्या जशा वेगवेगळ्या प्रजाती आणि प्रत्येकाची वेगळी चव... तसेच हे आहे. प्रत्येक जागेचे एक स्थान-महात्म्य असते... एक इतिहास असतो... तो प्रवास, तो अनुभव गाठीशी बांधणे हे महत्वाचे असते. ‘वारी’ या संकल्पनेचे हेच मूळ आहे.

असे कितीतरी प्रसंग... कितीतरी घटना...
ज्ञानावर श्रद्धा ठेवून, ज्ञानोपासना करून, भक्तिमार्गाचे दीप प्रज्वलित करून अंतरीचे ‘स्व’त्व जाणून घ्या आणि विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवा असा मोलाचा उपदेश माउलींनी आपल्या सगळ्यांना दिला आहे.
ज्ञानेश्वरीची सांगता करताना माउलींनी एक मागणं मागितलं... आपले गुरु असलेल्या विश्वेश्वररुपी श्री. निवृत्तीनाथांना. ही नुसती प्रार्थना नव्हे... नुसतं मागणं नव्हे, तर एक प्रसाद... फक्त तुमच्या-आमच्या कल्याणासाठीचा नव्हे, तर ‘विश्वकल्याणाचा’...

                        ‘दुरितांचे तिमिर जाओ | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
                         जो जे वांछील, तो ते लाहो | प्राणिजात ||’

त्या विश्वात्मक निवृत्तीनाथांनी तात्काळ ‘हा होईल दान पसाओ’ असा आशीर्वाद देऊन ‘पसायदान’ सिद्ध केले.
‘पसायदान’... हाच तो मनुष्याला अभिप्रेत असलेला खरा ‘धर्म’... व्याख्या, रूढी, नियम, कर्मकांड व तत्वप्रणालीच्या निरुपयोगी परिघाला छेदून दशांगुळ उरलेला...
या व्यतिरिक्त उदात्त आणि निर्मळ असं काय असणार? काही नाहीच.
सत्य, शिव आणि सुंदरतेचे हेच ते ‘ज्ञानेश्वरीय’ अधिष्ठान.

आणखी काय बोलावें?
‘कहाणी मागची कहाणी’ या पुस्तकांत गो.नि. दांडेकर ‘मोगरा फुलला’ बद्दल सांगतात--
“अठराव्या वर्षी मी आळंदीस गेलो. तेथें अडीच वर्षे माधुकरी मागून राहिलो. त्या परमपित्याच्या छत्राखाली मी विसावलो. अन्याया विरुद्ध झगडावं, सत्याग्रह करावा, कारावास भोगावा, ही प्रेरणा मला ज्ञानदेवांनी दिली. हातून अनेक अपराध घडले; पण ज्ञानेश्वरीचं विस्मरण झाले नाही. अशी ज्ञानेश्वरी माझं सर्व अस्तित्व व्यापून दशांगुळ उरली आहे. अगदी बाल्यदशेत या मायबोलीला एक मधुर स्वप्न पडलं. त्याचं नावं ‘ज्ञानेश्वरी’. जोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, तोपर्यंत ती या, अतिशय सोसांव लागलेल्या ‘लहानग्याच्या’(ज्ञानदेव) ऋणांत राहील.
मी वारकरी. मजवरचं ज्ञानदेवांचं तत्वज्ञान विषयक ऋण न फिटण्याजोगं आहे. अत्यंत उदार, सर्व समावेशक, कुणाचाही द्रोह न करणारा आणि प्रसंगी प्राणांची बाजी लावणारा असा हा धर्म- असं तत्वज्ञान. त्याचा आदिगुरु ज्ञानदेव आहे. त्यांचं आणखी एक ऋण आहे. आपलं नियोजित काम संपताक्षणी उठून बाजूला सरावं, तिथे रेंगाळू नये, हे ज्ञानोबांनी शिकवलं.
अशी ही ऋणं सांगू तरी किती? ती अंशतः फिटावीत, म्हणून मी ‘मोगरा फुलला’ लिहिली. तो दीड महिना माझा मी नव्हतो. एका तंद्रेंत होतो. झपाटल्यासारखा लिहित होतो. दुसरं कशाचं भान नव्हतं. ‘मोगरा फुलला’ हे एका अर्थें देवकृत्य आहे.”

मराठी सारस्वतात याहून सुंदर, लयबद्ध आणि भावोत्कट गद्य-लिखाण कुणीही केलं नाही आणि कुणी करणारही नाही. गो.नि. दांडेकर लिखित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मराठी साहित्याचा कळससाध्य असा सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहे. ज्ञानदेवांच्या आई-वडिलांच्या विवाहा आधीच्या जीवनापासून ते ‘माउलींच्या’ संजीवन समाधी पर्यंतचा हा प्रवास केवळ ‘कादंबरी’ न राहता खरोखर ‘अमृतानुभव’ होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी, परस्परांमध्ये ‘मैत्र जीवांचे’ जडण्यासाठी आणि लोकोद्धारासाठी ज्ञानदेवांनी ‘गुरु’रुपी विश्वात्मक विश्वेश्वराला पसायदान मागितले होते... त्याचे स्मरण करूनच; ‘मोगरा फुलला’ लिहून ‘गोनिदां’नी मराठी भाषेला अमूल्य साहित्याचे असेच एक दान दिले आहे. हे पुस्तक वाचून मनात पहिल्यांदाच कधी नव्हे ती ‘कृतार्थतेची’ आणि ‘धन्यतेची’ भावना दाटुन आली. कुठलेही पुस्तक वाचताना या आधी असे झाले नव्हते आणि पुढे होणारही नाही... कारण आता ‘अजानवृक्षाच्या छायेत’ मन अभुतपूर्व तृप्ततेने व समाधानाने भरले आहे. अधिक सांगण्यासारखे काहीच नाही... जे आहे, ते शब्दांपलीकडले आहे. ‘ज्ञानियांचा राजा’ या अभंगात श्री. तुकोबाराय जे म्हणतात ते स्मरून समारोप करतो.
                                   
                                    “मज पामरासीं काय थोरपण,

                                    पायींची वहाण, पायीं बरी |”



(संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी, आळंदी)

Monday 23 September 2013

जिगरबाज




U.S. Open 2013 ची फायनल... रात्री अपरात्री झोप डोळ्याआड कुलुपबंद करणे आवश्यक होते... कारणही तसेच होते... नदाल vs. जोकोविक... दोघेही अप्रतिम खेळाडू... दोघेही माझे favourite, पण नदाल माझा सगळ्यात आवडता टेनिसपटू. त्या दिवशी match टाळण्याचा तर प्रश्नच नव्हता... गजर लावला होता... २ वाजता उठून TV समोर बसलो... कितीही नाही म्हटलं तरी झोपेचा अर्धवट अंमल होताच पण रंगतदार सामना पुढ्यात ठेवला असल्यावर कशाची तमा बाळगायची!!

नदाल व फेडरर टेनिस जगतात एकेकाळी most celebrated प्रतिद्वंदी म्हणून संबोधले जात असत परंतु नदाल-जोकोविक एकमेकांचे खरे arch-rivals आहेत कारण दोघांमधली ही तब्बल ३७ वी लढत होती. पुरुषांच्या टेनिस सामन्यांत कुठलेही दोन प्रतिस्पर्धी इतकेवेळा एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. दोघांची लढत पाहण्यात अतीव आनंद असतो. दोघांची खासियत अशी की court चा प्रत्येक इंच ते ‘cover’ करतात, मनगटाच्या जोरावर defensive to offensive होऊ शकतात, सलग शॉट्स खेळून प्रतिस्पर्ध्याला हैराण करतात, दोघेही उत्कृष्ट athletes आहेत आणि प्रत्येक point कमावण्यासाठी जीवाचं रान करतात.
दोघांच्या ह्या rivalry बद्दल जोकोविक म्हणतो, "You just feel that there is the last drop of energy that you need to use in order to win the point. Sometimes I attempt winning those points; sometimes him. It's what we do when we play against each other, always pushing each other to the limit. That's the beauty of our matches and our rivalry."
सोमवारी (U.S. Time नुसार) एकदाचा सामना सुरु झाला. नदालची तयारी उत्तम वाटत होती. ४२ मिनिटे चाललेला पहिला सेट नदाल ने ६-२ जिंकल्यावर दुसऱ्या सेट मध्ये जोकोविकने तुफानी खेळ दाखवत ३ वेळा नदालला ‘Break’ केले. या सेट मधली ५४ शॉट्स ची Rallyडोळ्यांचे पारणे फेडून गेली. Flushing Meadows मध्ये उपस्थित असलेला प्रत्येक जण मुक्तपणे दाद आणि standing ovation देत होता. आतापावेतो माझी झोप पूर्ण उडाली होती. जोकोविक ने ४-२ अशी आघाडी घेतली होती आणि याच सेट मध्ये नदालला तिसऱ्यांदा ‘Break’ करत ५-३ पर्यंत मजल मारली. ५-३ चा आकडा ६-३ मध्ये बदलवत जोकोविकने दुसरा सेट आपल्या खिशात घातला होता. तिसऱ्या सेट मध्ये कधी नदाल तर कधी जोकोविक वरचढ ठरत होता. ३-३ असा सेट रंगात आला असताना महत्वाच्या वेळी जोकोविकने केलेले unforced errors त्याला महागात पडले. दोनदा त्याने serve drop केली. ४-४ अशी बरोबरी असताना नदालने पुढे आक्रमक खेळी केली आणि जबरदस्त चिकाटीचे प्रदर्शन करत तिसरा सेट ६-४ असा जिंकला. सामना संपल्यावर या सेट बद्दल नदाल म्हणाला “I thought to run for every point, fight for every ball and play aggressive. And that's what I did in the third set.” नदाल जोमात आला होता. चौथ्या सेट मध्ये जोकोविकला संपूर्ण हतबल करत त्याने ६-१ असा सेट जिंकला आणि U.S. Open Championship देखील... केवळ रात्री शेजारची लोकं जागी होऊ नयेत म्हणून मी आनंदाने उड्या मारणे टाळले होते. माझ्यासारख्या नदाल fan साठी तो जल्लोष करण्याचाच क्षण होता.

३ तास २१ मिनिटात नदालने सामना जिंकला होता. १३ वे Grand Slam, २ रे U.S. Open स्वतःच्या नावावर जमा केले. हे सारं अभूतपूर्व होतं. मागीलवर्षी नदाल U.S. Open ची फायनल TV समोर बघत होता. त्याच्या career वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या समस्त चाहत्यांना तो पुन्हा खेळू शकेल याची शाश्वती नव्हती. गुडघ्याच्या मोठ्या दुखापतीमूळे ७ महीने बेजार असलेल्या नदालनी या वर्षी जबरदस्त comeback केले आहे. गेली काही महीने नदाल कुठल्या दुखण्यातून जातोय आणि त्याला कुठली मानसिक अस्वस्थता जाणवत असेल ह्याचा विचारही मी करू शकत नाही. पण जिद्दीने त्याने या सर्व संकटांवर मात केलेली प्रत्ययास आले. नक्कीच खऱ्या champion ची ती लक्षणे आहेत. विम्बल्डनला पहिल्याच फेरीत बाद झाल्याचा अपवाद वगळता त्याचा या वर्षीचा रेकॉर्ड कौतुकास्पद आहे. एकूण १० Titles त्यांनी यंदा खिशात घातले आहेत. २०१३ चा त्याचा रेकॉर्ड ६०-३ असा आहे. 

या वर्षीच्या त्याच्या खेळाबद्दल नदाल म्हणतो For a few reasons this season is probably the most emotional one in my career. This is much more than I could ever have dreamed of. Looking back, all this is a bonus, because I’ve done much more than I would have expected seven months ago.  आश्चर्याची बाब म्हणजे Clay Court चा बादशाह म्हणून संबोधला जाणाऱ्या नदालने या वर्षी Hard Court वर कमाल केली आहे. २२-० असा त्याचा Hard Court वरचा रेकॉर्ड आहे. हे त्याच्या fans ला देखील अचंबित करणारे आहे. ह्या Season मध्ये, दुखापतीतून बाहेर पडल्यावर नदालने आपल्या खेळात जरा बदल केलेला जाणवला. Closer to Baseline खेळणे, Forehand चा अधिक वापर आणि one-handed backhands व त्याचे aggression केवळ अप्रतिम होते.
फायनल नंतर बोरिस बेकर आणि ७ Grand Slam विजतेपद पटकावलेला McEnroe च्या comments समर्पक होत्या.
बोरिस बेकर म्हणतो, Nadal has performed at an unbelievably consistent level throughout the year, every match he has played he’s been close to perfection.”
“I think he’s a freak of nature,” McEnroe said. “I’ve seen videos of him when he was 13 or 14 and he had the same kind of energy and attitude, the way he played then. That was the way he was and when you talk to people who have gone to Majorca, and to Juan Monaco and different guys like that who have gone to train with him, he literally goes from playing four hours of tennis and then goes to play an hour or two hours of soccer. So clearly he’s got this incredible energy and this incredible athleticism and amazing desire. Let’s hope he stays healthy because it will be great for our sport.
 वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरुवात केल्यापासून नदालने बरेच चढ-उतार पाहिले आहेत. आठव्या वर्षी त्याने Under-12 Regional Championship जिंकली. त्यावेळी तो Football ही खेळत असे. त्याच्या काकांनी (टोनी नदाल) राफा ला छत्रछायेखाली घेऊन Training द्यायला सुरुवात केली. नदालच्या जडणघडणीत त्याच्या काकाची भूमिका महत्वपूर्ण आहे आणि नदाल हे कधीच विसरत नाही. १४ व्या वर्षी Spanish Tennis Federation ने नदालला Barcelona येथे Training चा पर्याय ठेवला होता पण नदाल व त्याच्या कुटुंबीयांनी तो साफ नाकारला. टोनी नदालचे असे म्हणणे होते की उत्तम खेळाडू व्हायला अमेरिका किंवा तत्सम मोठ्या शहरात अथवा देशात जायची गरज नाही. Passion असेल तर काहीपण साध्य करता येतं. (आजही नदाल ने त्याचे मूळ गाव सोडलेले नाही. फेडरर, मरे, जोकोविक या दिग्गजांनी अनुक्रमे दुबई, सरे आणि Monte Carlo ला आपले बस्तान हलवले आहे. नदाल हा सगळ्यात homely खेळाडू म्हणून ओळखला जातो. कुटुंबाशी जुळलेली नाळ त्याने कधी तोडली नाही. Twitter वर सतत दिसणारे त्याचे family photos कदाचित याचीच साक्ष देतात.) परिणामस्वरूप federation कडून हवी तशी आर्थिक मदत नदालला मिळाली नाही. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. १५ व्या वर्षी नदाल व्यायसायिक टेनिसपटू झाला होता. १७ व्या वर्षी त्याने फेडररला पराजित करून विम्बल्डन च्या तिसऱ्या round मध्ये प्रवेश मिळवण्याचे कर्तब दाखवले. नदालचा आलेख चढता होता. २००५ साली French Open च्या सेमी-फायनल मध्ये त्याने फेडररचा पराभव करत पहिल्यांदा Grand Slam च्या फायनल मध्ये प्रवेश केला आणि मारीयानो प्युरेटाला हरवून पहिले French Open Title Grand Slam जिंकले. तेव्हापासून आतापर्यंत नदालने ८ वेळा French Open वर आपले नाव कोरले आहे. २००९ साली Australian Open, २००८ आणि २०१० साली विम्बल्डन आणि २०१०, २०१३ साली U.S. Open असे एकूण १३ Grand Slams त्याने आपल्या नावावर केले आहेत. दुखापत रहित राहिल्यास, नदालचे वय बघता आणखी काही Major Titles तो भविष्यात उंचावेल असे वाटते.

यंदाचे U.S. Open जिंकल्या जिंकल्या टेनिस विश्वात ‘नदाल फेडररचा सर्वाधिक Grand Slam चा विश्वविक्रम मोडेल का?’ ही चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु झालीये. पण नदालला ह्या आकड्यांच्या खेळाचे सोयरसुतक नाही. तो म्हणतो, The only thing I can say is what I say every time. I'm going to keep working hard. I'm going to keep doing my things to have more chances in the future to be competitive and to produce more chances to win tournaments like this one. You never know when you will win your last one.”

येणारा काळ नदाल साठी सत्वपरीक्षेचा असणार आहे.
कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या दुखापती त्याच्या करियरला मारक ठरल्या आहेत. अन्यथा आज काही वेगळेच आणि आणखी दिमाखदार चित्र बघायला मिळाले असते. जरी नदालने दुखापतींना चीतपट करून प्रत्येकवेळी धडाकेबाज comeback केले असले तरी त्याची गुडघ्याची दुखापत कधीही डोकं वर काढू शकते. ते टाळण्यासाठी बोरिस बेकरने तर जाहीरपणे नदालला Grass Court वर न खेळण्याचा सल्ला दिला आहे. पाच वेळा विम्बल्डन मध्ये प्रवेश करून आणि दोनदा जिंकूनही नदाल करिता Grass Court या पुढे कायमच दुखरी नस असणार यात शंका नाही. Hard Court वरचे हे सातत्य त्याने मात्र तसेच ठेवायला हवे.  तांत्रिकदृष्ट्या हे फार अवघड असेल.

भविष्यात टेनिस मध्ये कमालीचे बदल घडलेले दिसतील.
वय वर्ष २६ असलेला जोकोविक अग्रमानांकित आहे. त्याचा खेळ उत्कृष्ट असतो. येणारा काळ तो गाजवणार यात दुमत नाही. मरे, डेल पोट्रो, वावरिंका, गास्केट, फेरर कधीही धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता राखतात पण राफेल नदाल हा मला टेनिस मधला सगळ्यात ‘जिगरबाज’ व mentally toughest खेळाडू वाटतो. त्याचे Fighting Spirit, Adaptability आणि Problem Solving ability चे कौतुक करावे तेवढे कमीच !! सध्याचा काळ हा टेनिस चा सुवर्णकाळ सुरु आहे आणि तो अबाधित राहण्यासाठी राफेल नदाल तंदुरुस्त राहून त्याचा सर्वोत्तम खेळ खेळणे हे गरजेचे आहे. राफा... तुला ‘सलाम’ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!Vamos Rafa’.